जालना : राज्यात मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ पाहायला मिळत होता. अखेर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाची बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सकाळी जरांगे यांनी उपोषण सोडले. यावेळी मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा आंदोलकांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीही मनोज जरांगे सारखे स्वस्थ बसणार नाही’ असं म्हणत शिंदे यांनी आश्वासन दिल आहे.
शिंदे पुढे म्हणाले,’आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारने मराठा समाजाला यापूर्वीही 16 आणि 17 टक्के आरक्षण दिलं होत. अध्यादेश काढला होता. कोर्टाने स्थगित केला. आपण कायदा केला. सरकारने 12 ते 13 टक्के कन्फर्म केला. पण दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकला नाही. तो का टिकला नाही, हे मनोजलाही माहीत आहे. त्यावर मी बोलणार नाही. पण आरक्षण देण्याची भूमिका आहे.
आरक्षण रद्द झालं. आणि तेव्हा 3700 मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. पण मी त्यांना नोकऱ्या दिल्या. जे काही होईल त्याला सामोरे जावू असं ठरवलं. ते मुलं आजही नोकरीत आहेत. इतरही सुविधा दिल्या.’ असेही शिंदे आंदोलकांशी संवाद साधतांना म्हणाले आहे.