महापालिका निवडणुकीसाठी बांधबंदिस्ती; राजकारणही झाले अनलॉक
पुणे – महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या तशी राजकीय पक्षांची बांधबंदिस्ती करण्यासाठी धावपळ उडू लागली आहे. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस पक्षात तर नेमणुकांचा सपाटा सुरू झाला आहे.
लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून वातावरण शांत होते. पण, अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांत तर कॉंग्रेस पक्षात अनेकांना नेमणुकांची पत्रं देण्यात आली, त्याचे फोटो सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.
उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, आघाड्यांचे सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य अशा वेगवेगळ्या पदांवरील नेमणुकांची पत्रं वाटली जात आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार सध्या करोनामुळे गर्दीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे कार्यकारिणी आणि आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावता येत नाही. ती बैठक बोलवायची झाली तर निर्बंध आड येतील, हॉल अपुरा पडेल एवढी संख्या होईल.
कॉंग्रेस पक्षाची ही तऱ्हा. तर, भारतीय जनता पक्ष याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. या पक्षाने पुणे शहरासाठी सात प्रवक्ते नेमून राजकीय क्षेत्राला अचंबित करून टाकले आहे. याच पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर हे एकेकाळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. त्यांच्याच पुण्यामध्ये शहरासाठी सात प्रवक्ते नेमण्यात आलेले आहेत. या संख्येबद्दल त्यांची प्रतिक्रिया काही समजू शकलेली नाही.
भाजपने शहर पातळीवर अनेक नेमणुका केलेल्या आहेतच शिवाय प्रभाग पातळीवरही अशाच नेमणुका झालेल्या आहेत. कसबा मतदारसंघात तर प्रत्येक रस्त्यावर नव्याने नेमणूक झालेल्यांच्या पाट्या, फलक दिसतात. कसब्यातील रहिवाशांमध्ये भाजपमधील नेमणुका हा चर्चेचा विषय झालेला आहे. एका 65 वर्षाच्या महिलेला प्रभाग समितीच्या चिटणीस म्हणून नेमण्यात आलेले आहे. त्या बाईंच्या घरावर फलक लागला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले.
कसबा मतदारसंघात यापूर्वी वाडा संस्कृती नावाची एक समिती होती. राजकीय पक्षात अशा नावांची समिती कशी काय? असा प्रश्न लोकांना होता. परंतु या समितीच्या नावांवर वर्षातून एक कार्यक्रम व्हायचा. त्याची अनेकांना आठवण झाली. वास्तविक भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अध्यक्ष, मुख्य सरचिटणीस आणि खजिनदार या तीन पदांनाच महत्त्व असते. त्यातही कॉंग्रेस पक्षात त्याखालोखाल ब्लॉक कमिटी अध्यक्ष, महिला कॉंग्रेस अध्यक्ष आणि आघाड्यांचे प्रमुख यांना महत्त्व असते. प्रदेश प्रतिनिधी हे एक महत्त्वाचे पद समजले जाते.
भाजपमध्ये विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, आघाडी प्रमुख आणि प्रदेश प्रतिनिधी यांना महत्त्व असते. बाकी नेमणुका या कार्यकर्त्यांना कामासाठी प्रोत्साहन म्हणून केलेल्या असतात. पण, त्या संख्येला काही मर्यादा असाव्यात की नाही यावर काही नियंत्रण नाही. काही चाणाक्ष कार्यकर्ते नेमणूक पत्राचा खुबीने वापर करून समाजातील आपले प्रस्थ वाढवतात. पक्षासाठी असे कार्यकर्ते महत्त्वाचे असतात.
एका जाणकाराच्या मते पक्षसंघटना बांधणीसाठी फार काटेकोर होऊन चालत नाही. अशा नेमणुका करून वातावरणनिर्मिती करावीच लागते. निवडणुका आल्यावर बुथ कमिटी सदस्यांची या नेमणुकांमध्ये भर पडते.