कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी टाळ-मृदंगाचा गजर
कोल्हापूर – केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रात्र राज्यभर आत्मक्लेष जागर आंदोलन केलं गेलं. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
पिठलं भाकरी खात रात्री आठ वाजता सुरू झालेले आंदोलन पहाटे सहा वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये सुरू होतं. जवळपास तापमान 17 अंश पर्यंत खाली येऊन पोहोचलं होतं. अशा थंडीमध्ये हे सर्व शेतकरी भजन-कीर्तन गात केंद्र सरकारचा निषेध करत होते. रात्रभर सुरू असणाऱ्या या आत्मक्लेश जागर आंदोलनाची सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शपथ देऊन केली आहे. तसेच मुक्या आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देत राज्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी आपले पुरस्कार परत केल्यास लाखाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला बारा हत्तींचे बळ मिळेल असे देखील शेट्टी यांनी यावेळी म्हटले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, म्हणून दिल्लीत गेली सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गारठणाऱ्या थंडीत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश आंदोलन केले. टाळ-मृदंगाचाया गजरात भजन करत केंद्र सरकारला सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.अदानी, अंबानीसाठी देशातील शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक ते उद्योग भवनपर्यंतचा रस्ता पोलिसांनी सायंकाळनंतर बंद केला.
रिक्षा थांब्याजवळच आंदोलकांनी रस्त्यावर जाजम टाकून ठाण मांडून होते. शेजारी ओढा असल्याने तिथे थंडीची तीव्रता जास्त होती. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घरातूनच भाकऱ्या बांधून आणल्या होत्या. तिथे खर्डा व पिठलं केले होते, रात्री त्याचा आस्वाद घेतला. या आंदोलनामुळे धरणग्रस्तांच्या आंदोलनाची आठवण ताजी झाली.
राजू शेट्टी म्हणाले, नवीन कायद्याच्या आडून बड्या उद्योगपतींना भारतीय अन्न महामंडळ हडप करायचे आहे. त्यांच्या मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन कमी दराने शेतीमाल खरेदी करून तो गोडावूनमध्ये ठेवायचा आणि सुगी संपल्यानंतर तो चढ्या दराने विक्री करण्याचा घाट आहे. यामध्ये शेतकऱ्यांबरोबर सामान्य ग्राहकही भरडला जाणार आहे.दिल्लीत आंदोलन करणारे हे शेतकरी नाहीत, अशी वल्गना भाजपचे नेते करत आहेत. या देशातील अन्नदात्याला जे ओळखत नाहीत, त्यांना डीएनए टेस्ट करावी लागेल, अशी टीका शेट्टी यांनी केली.
कोंबड्या घ्या म्हणून पळून जाणारे मोकाटच
नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शाश्वती नाही. एकाने कडकनाथ कोंबड्या घ्या म्हटला आणि पळून गेला तसेच प्रकार या नवीन कायद्याने होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
काँग्रेसचा पाठिंबा
आंदोलनला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला, यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत गुलाबराव घोरपडे, संजय वाईकर आदी उपस्थित होते.