माझं गाव तसं टेकडमाथ्याला वसलेलं! एक बारीकसा ओहळ त्या टेकडीला वळसा घालून रमतगमत वाहत जातो आणि पुढे पंचगंगेला मिळतो. या ओहळाच्या उशाला आमचं गाव आणि दीड-दोन मैलांवर पायशाला अगदी तसंच आणि तेवढंच खेडं! आमच्या खेड्याचं जुळं भावंडंच म्हणा ना! या दोन खेड्यांनी अगदी पूर्वी संसारही एकत्र केला. ग्रुप ग्रामपंचायत होती! पण नंतर दोन्ही खेडी आडवी पसरू लागली आणि हळूहळू दोन्हीकडे सवतासुभा मांडला गेला. निसर्गाचा नियमच आहे तसा! पण दोन्ही खेड्यांचा एकमेकांवरचा जीव काही कमी झाला नाही. रोटी-बेटी अजूनही शक्यतो एकमेकांतच होते.
आमच्या लहानपणी माणसं एकमेकांच्या बांधावर राजीखुशीने राबत असत. या गावच्या यात्रेला तिकडे पोसलेल्या पावट्याची आमटी उकळत असे आणि तिकडच्या यात्रेला इकडच्या उसाची काकवी पाहुण्या-रावळ्यांच्या जिभेला गोडवा लावी.
या दोन गावांना जोडणारा अजूनही एक घट्ट आणि जिवंत ‘दुवा’ होता तो म्हणजे पानारी आज्जी! पानारी आज्जी होती तिकडच्या गावची… पण तिचा जीव रमे तो आमच्याच गावात. पानारी आज्जी असेल तेव्हा 60-65ची! गोऱ्यापान आणि सुरकुत्यांच्या जाळ्यांनी भरून गेलेल्या तिच्या चेहऱ्यावर हिरव्याकंच गोंदण्याचे चंद्र आणि चांदण्या शोभून दिसत. कपाळावर रुपयाएवढं लालभडक कुंकू असे. घामानं बऱ्याचदा कपाळभर त्याचा लालभडक रंग पसरून जाई.काळ्या-पांढऱ्या केसांची मिश्र महिरप चापूनचोपून तेल लावून पाठीमागे अंबाड्यासदृश वळलेली असे. डोकं पदरानं पूर्ण झाकलेलं आणि डोळ्यांवर कित्येक वर्षांचा जुना, अनेकदा फुटूनही जगण्याची आशा बाळगून असलेला-अनेक ठिकाणी तडकलेला चश्मा! तो चष्मा लेकरांच्या करगोट्याच्या काळ्या दोऱ्यानं गळ्यात बांधलेला असे! ठेंगणीशी आणि नाजूक चणीची पानारी आज्जी वार्धक्यातही साजीरी दिसायची. तिचा आवाजही काकवीसारखा गोड!
पानारी आज्जीच्या पानारी या नावालाही इतिहास होता. पानारी आज्जीला पान खाण्याची भारी हौस! खाऊच्या पानाच्या तोबऱ्याने तिचं तोंड नेहमी तांबडंभडक असे. त्या तोबऱ्यातही बोलण्याचा सोस तिला आवरायचा नाही. ‘पान खावं बी नि खाऊ घालावं!’ असं म्हणत म्हातारी पानाचं महत्त्व सांगत सुटायची. तरूणपणी म्हातारी वाघिणीसारखं काम करायची म्हणे आणि पानाचा तोबरा भरल्या तोंडानं साखरपेरणी करायची. गोड आवाजात आल्या गेल्याची ख्याली-खुशाली विचारायची.
लेकीसुनांच्या तोंडावर हात फिरवून कानाशी आपल्या हाताची बोटं मुडपून दृष्ट काढायची. म्हातारी खरंतर साखरेसारखी मिठ्ठासच होती. पण वय वाढलं तसा कामाचा जोर ओसरला. स्वयंपाकघर सुटलं. चुलीवरचा हक्कही संपला. कमरेत वाकलेली ही म्हातारी जेव्हा मुलां-सुनांना संसारात नकोशी झाली तेव्हा मग कमरेला पानाची कापडी पिशवी खोचून इकडं-तिकडं हिंडून ती आपलं मन रमवू लागली. धुवट नऊवारी पातळाच्या तिच्या डाव्या कमरेला गडद हिरव्या रंगाची पानाची चंची बांधलेली असे. त्यात नागवेलीची पानं, चुन्याची डबी, कात, तंबाखूची पिशवी, अडकित्ता, सुपारी असा ऐवज भरलेला असे. पान खात-खाऊ घालत भेटेल त्याची चौकशी करत, ज्याच्याकडे वेळ असेल-ऐकून घेईल असा कोणी भेटलाच तर त्याला आपली व्यथा सांगत म्हातारीच्या जीवाचं गाठोडं दिवस कंठत होतं.
गावाकडं शेतकऱ्यांच्या-कष्टकऱ्यांच्या श्रमाला अंत नसतो. चहा पिणं, पानसुपारी खाणं हा मेहनतीच्या कामातला तात्पुरता विसावा होता आणि अजूनही असतो. पानारी आज्जी श्रमिकांना त्या विसाव्याची संधी द्यायची. पानारी आज्जीनं पानं लावणं हा पाहणाऱ्यांसाठी सोहळाच असे. दोन हिरव्याजर्द पानांची जोडी आज्जी पदरानं दोन्ही बाजूंनी स्वच्छ पुसून घेई. मग नखांनी अलगद त्या पानांचे देठ काढून घेई. पानं उलटी करून त्यावर चुन्याचं नख लावी.
मग कात, सुपारी कधीमधी गुंजपाला घालून ती पानं चांगली आवळून दुमडे. कधीमधी लवंगेच्या काडीनं ती पानाच्या पुरचुंडीला टाका घाली आणि मग एकतर समोरच्याला देई किंवा स्वत: खाई. पण लवंग-गुंजपाल्याचे हे लाड गावाकडच्यांना परवडत नाहीत. तिथलं पान कात, चुना, सुपारीचंच! ते पान आपल्या डाव्या गालामध्ये ठेवण्याची तिची लकबही लाजवाब होती. पुढे पुढे हीच पान खायची सवय तिची वार्धक्याची काठी बनली. तिची लेकरबाळं बऱ्या-चांगल्या हुद्द्यावर होती. पैसापाणी कमवत होती पण त्याचं सुख पानारीच्या नशिबात नव्हतं.
वार्धक्याबरोबर अवहेलनाही वाढत गेली आणि म्हातारी तिचं गावं सोडून आमच्या गावात राहायलाच आली. कमरेचा बाक सांभाळणंही अवघड होतं पण ती डगमगली नाही. तिच्या पान खायच्या हौसेनं तिला नवा जन्म दिला. गावांनं जणू तिचं आडनाव टाकलं आणि ती साऱ्यांची पानारी आज्जी झाली.
पानारी आज्जी थकल्या भागल्या शरीरानं दूर तालुक्यावरून डोईवर खाऊच्या पानांची पाटी भरून आणे. आमच्या गावची चढण चढताना म्हातारीच्या कमरेचा धनुष्य डुगडुगू लागे. जर्जर कृश देहाला कंप सुटे. पण म्हातारी मानी होती. तिच्या देहाचं थकणं तिला थांबवू शकलं नाही. बसत-उठत दारोदारीचे उंबरे झिजवत ती तिच्या गोड आणि थरथरत्या आवाजात पानं घेत्यासा का वं?…पान खावावं बी नि खाऊ घालावं! म्हणत हाक घाली. आरोळी द्यायची ताकद तिच्यात राहिली नव्हती तेव्हा.
कुणाकडे चहाचं पाणी मागावं… कुणी म्हटलं तर अर्धी भाकरी पोटात ढकलावी आणि रात्री कुणाच्यातरी ओसरी पडवीत आपला थकला देह ढकलून द्यावा असा तिचा दिनक्रम झाला होता. म्हातारीचा एक लेक कॉलेजात प्राध्यापक होता. वारकरी संप्रदायात शिरल्यापासून कीर्तनही करू लागला होता. त्याच्या कीर्तनाला चांगली गर्दी होई. त्या दिवशी महाशिवरात्र होती. म्हणजे आमच्या गावची यात्रा! ग्रामदैवताच्या समोर कीर्तन होणार होतं. गावची झाडून सारी मंडळी देवळात जमली होती. देऊळ सुशोभित केलं होतं. गावची-परगावची जनता जत्रेसाठी गावची पायधूळ झाडत होती.
म्हातारीचा मुलगा कीर्तनाला उभारला. विषय होता, माता माऊली, दुनिया दावली! आईला जपा! आईच पहिला गुरू! जिथे आई नाही तिथे काही नाही! वगैरे वगैरे! कुणाला खाण्याचा शौक असतो! कुणाला पैशांची नशा असते! कोणाला प्रसिद्धीचा सोस असतो! या गुरुजींना टाळ्यांची प्रचंड लालसा होती! त्या भरात ते बोलत सुटले होते! बोलणं खरं होतं पण गुरुजींच्या कृतीपेक्षा ते शंभर टक्के निराळं होतं. पण तरीही टाळ्यांवर टाळ्या पडत होत्या. गुरुजींना व्यासपीठाची नशा चढली होती. इतक्यात गावाकडचा एक इरसाल आणि हजरजबाबी म्हातारा आत्मविश्वासाने उठला. टाळ्यांच्या गजरात सुरू असलेलं गुरुजींचं कीर्तन काही क्षण थबकलं.
म्हाताऱ्याने तोंडातली पानाची पिंक टाकली आणि घसा खाकरून तो म्हणाला, “”गुर्जी, समदं खरं हाये, माऊली नाय तर काई नाय! पण गुर्जी तुमची माऊली कुटं हाय? तुमी तिला किती जपता?” गुरुजी चपापले. आपण कुठल्याकुठे हा विषय घेतला अशा विचारांनी गुरुजींना घाम फुटला. कीर्तन थांबलं. लोकांचा दंगा वाढला. लोक हसू लागले-उठून जाऊ लागले. देवळाच्या शेजारच्या घरातल्या वळचणीला थांबलेली मायाळू पानारी आजी मुलाच्या जाहीर अपमानाने कळवळली आणि दातखीळ बसून तिथेच हे जग सोडून गेली. सारा गाव हळहळला.तेव्हापासून म्हातारीच्या जर्जर कमरेचं धनुष्य हा विषय तिथे नवा नाही. पानारी आजीने लहानथोर सर्वांना या धनुष्याची ओळख करून दिली आहे. म्हातारपणाला चकवा नाही. कमरेचं धनुष्य तुम्हाला-मला-साऱ्यांना येईल. पण तेही धनुष्य मानाने मिरवता आलं पाहिजे. खमकेपणानं वागवता आलं पाहिजे, हेच सांगून पानारी आज्जी गेली.
आता घरोघरच्या तरुण पोर-पोरींनी शिक्षणासाठी तालुक्याला बस्तान मांडलं. शिक्षण झालं की नोकरी शोधण्याचं शास्त्र असल्यासारखं ही तरुणमंडळी पुण्या-मुंबईकडे झेपावतात! गावाकडे हातापायांच्या काड्या झालेली म्हातारी माणसं आणि ज्यांना शहर झेपतच नाही अशी चार-दोन गावच्या मातीत मुरलेली टाळकी! पण तरीही गावगाडा चालला आहे. पूर्ण ताकदीने! कारण म्हातारपणीच्या धनुष्याला कोणी डरत नाही-कंटाळत नाही! उलट इंद्रधनुष्य समजून हसत राहतात! हे सूत्र म्हणजे पानारी आज्जीचं देणं आहे. लाखमोलाचं देणं!
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी