कधीकधी काय होते, आपण आपल्यालाच जगण्याची सवलत देऊ पाहतो. आयुष्य सुंदर आहे. खूप माणसे आपल्यावर प्रेम करतात. एखाद्याने नाही केलं तरी तितक्याने फरक पडू नये, इतके आपण स्वतःवर प्रेम करायला पुरून उराव अशीही कदाचित त्यामागे आपली अपेक्षा असावी. पण होते काय अनेकदा, ज्याला आपण जगण्याचे ईप्सित समजतो ते हातात कधीच न येणारे मृगजळ कधी बनून जाते ते आपल्यालाही कळत नाही. मग आयुष्यातल्या मृगजळामागे धावतच राहतो आपण, इथे इच्छा अनिच्छेचा प्रश्नच येत नाही. आपण पळण्याच्या शर्यतीतले खेळाडू आहोत असं मान हवं तर… पण धावावे तर लागतेच. आपण धावत असतो आपल्या इच्छा, आकांक्षा, ध्येय या साऱ्यांच्या मागे…तिथे आपण विसरून जातो आपण कशाच्या शोधात धावत होतो ते…
हो… हा शोध संपणारच नाहीये कधी… कारण शोधाच्या शेवटी ते ‘मृगजळ’ उभे असते! आणि कुणीच त्याला एवढ्या सहजासहजी शोधू नये हीच तर त्याची इच्छा! म्हणून या सर्व खेळाची रचनाच अशी केलेली असते की तो संपणारच नाही… एखादा खेळाडू पडेल, थांबेल, संपेल पण त्याच्या हातातील तो बॅट घेऊन, मागून येणारा दुसरा खेळाडू तसाच पुढे पळत राहणार. हेच त्या मृगजळाच्या यशाचे रहस्य. काही काही वेळा येणारे क्षण, अनुभव, आठवणी… या म्हणजे त्या बॅट सारख्या असतात… त्या हातात घेऊन फक्त पळत न राहता… उलगडून पहाव्यात… मग शोध संपतो… पळणं थांबतं. पहाटे उमलताना प्राजक्ताने गंधार छेडला तर; त्याचा ध्वनी कसा असेल किंवा ओंजळीत फुललेल्या मोगऱ्याचा दरवळ बोटांना जसा येतो… तसेच काहीसे होते आणि अव्यक्तांचे गाभारे मनात भुरभुरतात. त्यावेळी मौनच जवळचे वाटू लागतं.
‘रजिया सुल्तान’ मधलं ‘ऐ दिल ए नादॉं’ ऐकलं आणि भारावल्यासारखं पुन्हा पुन्हा ऐकत राहिले… काय माहिती काय ओढ होती त्या शब्दांत? लतादिदींचे स्वर काळीज कापत राहिले ‘ऐ दिल ए नादॉं… आरजू क्या है… जुस्तजू क्या है…’ एका ओळीत संपूर्ण आयुष्यभराचे अध्यात्म आणि मनाचे मनोव्यापार गुंफलेत… काय आहेत इच्छा आकांक्षा? मनालाच विचारल्यास, हम भटकते है… क्यो भटकते है दश्त ओ सहेरां में… आपण भटकत राहतो… का? भटकतो आपण केवळ कल्पनेतल्या मरूस्थळासाठी? हेच ते मृगजळ. वाळवंटात भरकटलेले हे मरूस्थळ शोधत भटकतात… सगळं असतं आपल्याजवळ तरीही तगमग काही संपत नाही… ऐसा लगता है… मौज प्यासी है, अपने दरीयॉं में…
ही जी कसमस आहे… अज्ञातासाठीची तळमळ आहे… ही संपत नाही… आपण सारे एकाच रस्त्याचे प्रवासी… या प्रवासात तू, मी, तो, ती, ही सारेच भरकटलेले… या विश्वातल्या धुळीच्या कणाइतके… या शोधात किती घायाळ झाले… किती बळी गेले… पण शोध थांबत नाही… मग मी काय करते माहितीय? मी मलाच आठवते… माझ्या शब्दांत गुंफते म्हणजे मग माझ्याच शोधात मी हरवले तरी माझ्याच शब्दांमधून माझे अस्तित्व अबाधित राहील… निरंतर…
बरेचदा नसलेल्या गोष्टींमध्ये विनाकारण जीव अडकवला की जीव तुटतोच, स्वत:ला नाकारण्याच्या गोष्टींचा सहज स्वीकार कधी होईल का, हेही माहीत नसतं आणि हे कळायला एक काळ भोगावा लागतो. तो पार केला की माणसे ओळखता येतात, एकदा का हा जीवघेणा जीव गुंतवण्याचा काळ संपला की, त्याच त्या लोकांवर आपण अतिशय संयमाने जीव लावायला शिकतो… ‘निरपेक्ष’ या शब्दाच्या खऱ्या अर्थासकट… अशावेळी सोबत कुणी असो वा नसो, सुख असो की दु:ख सगळे सारखेच वाटायला लागते. आपण आपल्यावरच प्रेम करायला लागतो. मग आजवर असह्य वाटणारा प्रवास आनंदाचा होतो. आपल्यावर खरे प्रेम करणारी माणसे ओळखण्याची ताकद येते. अशावेळी मनाची अवस्था एका आपल्याच धुंदीत जगणाऱ्या अवलियासारखी होते.
मी मनाच्या
एका कोपऱ्यात बसलेली असताना,
तुझी आठवण येते…
जशी की अर्धी ओली ठिणगी
पुन्हा धुरकटते,
गडद काळा धूर माखून…
त्या बरोबरच
हजारो विचार…
जसा की वाळलेल्या फांदीतून
वणवा उसासतो…
तेव्हा,
वेदनांचे निष्पर्ण झुले
दु:ख दु:ख म्हणता म्हणता
पांढरे होऊन झुलू लागतात
अन् मी
विझवते दोन्ही ठिणग्या
ओंजळी बंद करून,
चाफ्याची फुलं पांघरते देहावर
तेव्हा
एक उसासा लांबत जातो…
यें जमीं चूप है, आसमॉं चूप है
फिर ये धडकनसी
चार सू क्या है…
ऐ दिल ए नादॉं… ऐ दिल ए नादॉं…
– मानसी चिटणीस