निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत मौन पाळणार
पारनेर – संसदेत 2012 पासून प्रलंबित न्यायीक उत्तरदायित्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर करावे, निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावे, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करावी यामागण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात रणशिंग फुकले असून शुक्रवारपासून राळेगणसिद्धी येथे मौन व्रत सुरू केले आहे.
जोपर्यंत निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी होत नाही तोवर हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करीत सकाळी 11 वाजता राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात अण्णा हजारे मौनव्रत सुरु केले. राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, महिला त्याच्या संबंधित खटले जलद गतीने न्यायालयातील प्रलंबित खटले त्वरित निकाली काढावीत.
पोलीस ठाण्यांमध्ये महिलांनी एखादी तक्रार दाखल करायची असल्यास तेथे पोलीस कर्मचारी असल्याने महिलांना माहिती सांगण्यात अडचणी येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचारी अधिकारी नेमावेत.
यासह आदी मागण्यासाठी अण्णांनी हजारे यांनी मौनव्रत धारण केले असून जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मौनव्रत सोडणार नसल्याचा निर्धार अण्णा हजारे यांनी केला आहे. त्यांनी सकाळी यादव बाबा समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मौन धारण केले आहे. दरम्यान, हजारे यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना प्रशासनस्तरावर किंवा शासनस्तरावरून कोणी जबाबदार अधिकारी भेटला नाही.