मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या भावना
पुणे – शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत पडलेली फूट आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार यामुळे राज्यात राज्यात सत्ता स्थापनेस महिनाभर गेला. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न रखडले. त्यामुळे जनतेमध्ये या राजकीय पक्षांबाबत नाराजी आहे. मात्र, या सर्वांपासून आपला पक्ष दूर राहिल्याने राज्यात मनसे हा मतदारांसाठी सक्षम पर्याय असून पक्षाला हीच संधी आहे, अशा भावना राज्यातील जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्षांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या समोर मांडल्या.
विधानसभा निवडणुकानंतर राज्यातील स्थिती आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाकडून संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यात संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज ठाकरे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत मते जाणून घेतली. तसेच संघटनात्मक बांधणीसाठी कसे काम करावे, पक्षाची पुढची ध्येय धोरणे काय असतील यावर चर्चा केली. कात्रज येथील ऐश्वर्या लॉन्स येथे हे शिबिर पार पडले.
विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय उलथापालथी आणि सत्तास्थापना नाट्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका काय असावी, पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी काय करावे, स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे नागरिकांशी संवाद ठेवावा यावर चर्चा करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. यावेळी राज्यभरातील जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्षांनी राज्यात मनसेवगळता सर्वच राजकीय पक्षांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आपल्या पक्षाला राज्यात पर्याय म्हणून हीच संधी असून त्या अनुषंगाने पक्षाची वाटचाल असावी, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.