नगर – अनधिकृतपणे गैरहजर राहून शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत पारनेर तालुक्यातील शिक्षक प्रदीपकुमार बबनराव खिलारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबित केले आहे. ते जिल्हा परिषदेच्या तास (वनकुटे) शाळेत नियुक्त होेते.
गेल्या काही दिवसांपासून शिक्षक खिलारी यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. विशेष म्हणजे ते विनापरवाना शाळेवर अनेक दिवस गैरहजर होते. त्यासाठी त्यांनी कोणत्याही वरिष्ठांची परवानगी घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
शिवाय ते पारनेर तालुक्यातील एका राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांचे निलंबन करावे, असा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल झाला. त्यावर सविस्तर चौकशी करून २२ मार्च रोजी सीईओ येरेकर यांनी शिक्षक खिलारी यांचे निलंबन केले आहे. जोपर्यंत निलंबनाचा आदेश अंमलात राहील तेवढ्या कालावधीत शिक्षक खिलारी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती येथे असेल. त्यांना कोपरगाव गटशिक्षणाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांनी निलंबन काळात खासगी नोकरी स्विकारु नये. तसे केल्यास त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात येईल व निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास ते पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे.