फलटण – अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आपापल्या अंगणवाड्यांमध्ये रुजू व्हावे. जवळपास 70 लाख बालके आणि गरोदर मातांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहार पोहोचवला जातो. अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे आंदोलन गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू आहे. त्यांच्या मागण्यांपैकी निम्म्याहून अधिक मागण्या शासनाने पूर्णकेल्या आहेत. उर्वरित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
महाराणी सईबाई यांच्या जन्मस्थळी अभिवादन कार्यक्रमासाठी फलटण येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
तटकरे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या निम्म्याहून अधिक मागण्या शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये 13 हजार छोट्या अंगणवाड्यांचे रूपांतर मूळ अंगणवाड्यात करण्यात आले आहे. 13 हजार मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका म्हणून मध्ये पदोन्नती दिली आहे. तेथे मदतनीसांची 13 हजार पदे निर्माण होणार आहेत. भाऊबीज भेट, इतर सवलती आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शासन करत आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षातील 300 दिवस बालकांना पोषक आहार द्यावा लागतो. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी कामावर लवकरात लवकर रुजू व्हावे. बालकांना आहार आणि सुविधांपासून वंचित ठेवू नये.