मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील मैत्री निवासस्थानी रविवारी सकाळी ईडीने धाड टाकली आहे. जवळपास ४ तासांपासून ईडीचे अधिकारी राऊत यांच्या मैत्री बंगल्यामध्ये कारवाई करत आहेत. राऊत यांच्यावर सुरु असलेल्या या कारवाईबाबत आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप तसेच शिवसेनेतून फुटून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळी चूल मांडणाऱ्या गटातील नेत्यांनी ईडी कारवाईचे समर्थन केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या कारवाईमागे राज्यपालांचा राजीनामा वाचवण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘महाराष्ट्रातून, विशेष करून मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.’ असं वादग्रस्त विधान केलं होत. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आज सकाळीच राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे माध्यमांमध्ये सर्वत्र याचेच वार्तांकन सुरु आहे. मिटकरी यांनी नेमका हाच मुद्दा अधोरेखित करत हे राज्यपालांचा राजीनामा वाचवण्याचे षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी
मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत ट्विट करताना, “राज्यपालांच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी. आज ईडीचे पाहुणे श्री संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला.” असा आरोप लगावला आहे.
दरम्यान, राऊत यांच्यावर सुरु असलेल्या या कारवाईचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट व रामदास कदम यांनी जोरदार स्वागत केले आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये, त्यांनी शरद पवार यांची शपथ घ्यावी असा खोचक टोला शिरसाट व कदम यांनी राऊतांना लगावला आहे.
राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी ७ वाजल्यापासून ईडीचे १० अधिकारी दाखल असल्याची माहिती आहे. ईडीचे अधिकारी मोठ्या संख्येने कारवाईसाठी आले असल्याने राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय. शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना मैदानात उतरवलं आहे. अशातच आता राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यास सेने समोर आणखी पेच निर्माण होणार असल्याची चर्चा आहे.
राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाने ची ही नवी खेळी . आज ईडीचे पाहुणे श्री संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 31, 2022