मुंबई : देशभरात काल रामनवमीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. त्यातच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत एक आव्हान दिले आहे.त्यांनी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना उत्साहात रामनवमी साजरी करण्याचे आवाहन केले आणि स्वतः मात्र परदेशात निघून गेल्याची टीका केली.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी कार्यकर्त्यांना धुमधडाक्यात रामनवमी साजरी करण्यास सांगितले खरे पण ते स्वतः लंडनला अचानक का निघून गेले? आणि प्रभाव रामचंद्राला ते खरंच आदर्श मानत असतील तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं”, असे थेट आव्हान यावेळी मिटकरींनी दिले आहे.
पुढे बोलताना अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका करताना,” “त्यांना (राज ठाकरेंना) रामाचा आदर्श घ्यायचा असेल आणि समाजात चांगला आदर्श निर्माण करायचा असेल, तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं. आम्ही लहानपणापासून जे रामायण ऐकत आलो, वाचत आलो, त्यामध्ये हेच दाखवलं आहे की, राम आणि शत्रुघ्न हे सख्खे भाऊ होते. लक्ष्मण आणि भरत हे रामाचे सावत्र भाऊ होते. भरत हा सावत्र भाऊ असतानाही, प्रभू रामचंद्रांनी भावाशी भांडण न करता. भावावर टीका टिप्पणी न करता अयोध्येची गादी सन्मानाने भरतला दिली. ते लक्ष्मण आणि सीतेसह वनवासाला निघून गेले, हेच मी आजपर्यंत वाचलं आहे.” असे म्हटले आहे.
त्याच बरोबर, “त्यामुळे रामचंद्रांनी आपल्या सावत्र भावाला गादी दिली असेल, तर रामाला आपला आदर्श मानणाऱ्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं तरी धाडस दाखवावं, एवढीच मला अपेक्षा आहे. हिंदूजननायक नावापुढे लिहिणं आणि प्रभू रामचंद्रांच्या विचारावर चालणं, यामध्ये टोकाचा फरक आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, तुम्ही लंडनमध्ये निश्चित सुखरूप असाल. मात्र, आपल्या कार्यकर्त्यांना रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन तुम्ही अचानक कुठे गेला? याचं उत्तर तुम्ही परत आल्यानंतर महाराष्ट्राला द्यावं,” असे आव्हान देखील मिटकरींनी यावेळी दिले.