पिंपरी – मार्च अखेर असल्याने फायनान्स कंपनीची वसूली जोरदार सुरू आहे. त्यातच इंधनाच्या दरवाढीने महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. मुलांचे शिक्षण, वाढती महागाई, अपुऱ्या पगारात चालवणे झाले आहे. अनेकांनी नातलगांकडे पैसे मागून प्रतिष्ठा घालविण्यापेक्षा एखाद्या बॅंक अथवा फायनान्स कंपनीकडून गरजेपोटी कर्ज घेतले होते. परंतु वाढत्या महागाईमुळे नियमित हप्ते भरता येत नाही. थकलेले हप्ते वसूलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून गुंडांकडून वापर होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वसुलदारांकडून कर्जदारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, नातलग, मित्रांच्या मोबाइल फोन नंबरवर बदनामी करण्याची धमकी देण्यापासून ते थेट मारहाण करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांच्या गुंडगिरीमुळे कर्जदार अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
करोना संसर्गाच्या लाटेत अनेकांच्या नोकरी, व्यवसायांवर गदा आली. जगण्याचे साधन हातातून गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांकडून पुन्हा एकदा नवी उभारी घेण्यासाठी अनेकांनी रिक्षा, टेम्पो, कार, अशा विविध प्रकारची वाहने फायनान्स कंपन्यांच्या झटपट मिळणाऱ्या कर्जाच्या सहाय्याने घेत वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली. मात्र वाढत्या महागाईचा फटका पुन्हा एकदा या व्यावसायिकांना बसत आहे.
त्यामुळे अनेकदा फायनान्स कंपन्यांचे एक-दोन हप्ते थकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुसरीकडे एक हप्ता थकला तरीही फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीचे कर्मचारी कर्ज घेणाऱ्यांशी अक्षरशः सराईत गुंडांसारखे वागत असल्याची सद्यस्थिती आहे. संबंधित फायनान्स कंपन्या, त्यांच्या वसुली एजन्सीच्या व्यक्तींकडून कर्ज घेणाऱ्यांशी उद्धटपणे बोलणे, शिवीगाळ करीत आहे. एजन्सीच्या 4-5 व्यक्ती संबंधित नागरिकास रस्त्यात अडवून हप्ते भरण्यासाठी दमदाटी, मारहाण करीत आहेत. यासंदर्भात नागरिक पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर “कर्ज तुम्ही घ्यायचे, हप्ता तुम्ही थकवायचा आणि वाद घेऊन आमच्याकडे कसे येता’, अशा शब्दांत त्यांची बोळवण केली जात आहे.
मनमानी कारभाराला चाप बसेल का?
रिक्षा, टेम्पो किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे कर्ज थकल्यानंतर त्यांना कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता थेट वाहने उचलून नेतात. चालकाच्या संमतीशिवाय वाहनांची परस्पर विक्री केली जाते. एवढेच नव्हे तर वाहने उचलून आणल्यानंतर टोईंगचे 3 हजार 850 रुपये, त्यावर जीएसटी, वाहन पार्किंग करण्याचे प्रत्येक दिवसाचे 80 रुपये अशाप्रकारे अक्षरशः लूट केली जात आहे.
असे आहेत “आरबीआय’चे नियम
वाहन कर्ज घेणाऱ्यांशी कायदेशीर मार्गाने संपर्क साधावा. करारनामा पत्रे स्थानिक भाषेत असावेत. वाहन कर्ज घेणाऱ्यांना जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही. वाहन कर्ज घेणाऱ्यांची घरी, कार्यालयात जाऊन बदनामी करू नये.
हप्ते वसुलीसाठी सराईत गुंडांकडून केली जाते दहशत
पैसे वसूल करण्यासाठी सामान्य नागरिकांना वारंवार धमक्या
नातलग, मित्रांना फोन करून बदनाम करण्याची धमकी
घरासमोर उभे राहून आरडा-ओरडा करून बदनामी
घरामध्ये पुरुष नसताना महिलांना दमदाटी; घरातील वस्तू उचलण्याचा प्रकार