मुंबई : औरंगाबाद शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ’धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. ज्याला काल केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर आता राज्यात यावरून श्रेय वादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकार व महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून या या नामांतरावरून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील यावरून भाजपावर टीका केली आहे.
अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून,“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की, औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशीव करावं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतान त्यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत महाविकास आघाडीसमोर हा प्रस्ताव ठेवला. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना ते करता आलं नाही. मात्र महाविकासआघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली आणि आता आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचं काम भाजपाकडून होतंय.”अशी टीका मिटकरींनी केली.
पुढे बोलताना मिटकरींनी, “त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई नाही, निश्चितच नामांतर झालं याचा आनंद आहे. मात्र भाजपाने याचा असुरी आनंद घेऊ नये. हे श्रेय महाविकास आघाडीचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे.” असेदेखील म्हटले आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर त्या निर्णयाचा फोटो शेअर करत म्हटलं, नामांतर औरंगाबाद शहराचं आहे की संपूर्ण जिल्ह्याचं यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे स्पष्टीकरण मागत निशाणा साधला.