नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. पण सरकार मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले. अमित शहा यांनी जामिया मिलिया विद्यापीठातील पोलीस कारवाईचेही समर्थन केले.
जमावाकडून सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना कारवाई करणे भाग पडले असे अमित शहा म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात फक्त अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठ, लखनऊ आणि जेएनयू या चार विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे असे अमित शहा इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह परिषदेमध्ये म्हणाले.
देशभरात 400 विद्यापीठे आहेत. त्यातील फक्त 22 विद्यापीठांमध्ये आंदोलने झाल्याचे समोर आले आहे, असे शहा यांनी सांगितले. जामियामध्ये तोडफोड आणि हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही. परिस्थिती बिघडेपर्यंत थांबून कायदा-सुव्यवस्था राखली जाईल का? असा सवाल अमित शहा यांनी केला.
जर तुम्ही पंतप्रधान पदासाठी माझ्या नावावर चर्चा करत आहात, तर मी अजुनही पक्षातील ज्युनिअर सदस्य आहे. माझ्यापेक्षाही अनेक वरिष्ठ नेते पक्षात आहेत. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.