थिरूवनंतपूरम – भारतातील तिन्ही करोनाबाधित रूग्ण त्या विषाणूपासून मुक्त असल्याचे निष्पन्न झाले. चीनमधून परतलेल्या केरळमधील तीन विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी आढळले. त्यातील विद्यार्थिनी भारतातील पहिली करोनाबाधित ठरली. मात्र, सलग दोन चाचण्यांमध्ये तिला करोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिला लवकरच थ्रिसूरमधील रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळेल. करोनामुक्त आढळल्याने इतर दोन विद्यार्थ्यांना याआधीच रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
करोनाबाबत केरळमध्ये पूर्ण दक्षता घेतली जात आहे. त्या राज्यात 2 हजारहून अधिक आजारी लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यातील 8 जणांना विविध रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित लोकांवर त्यांच्या घरांमध्येच उपचार केले जात आहेत. अर्थात, त्यांच्यापैकी कुणालाच करोनाची लागण झाल्याचे आढळलेले नाही.