आळंदी – करोनामुळे यंदा अंलकापुरीत राहुट्या नाही…वारकरी नाही…टाळ मृदंगाचा गजर नाही…अभंगाची सुरावट नाही….इंद्रायणी दुथडी भरून वाहते; मात्र तीर्थस्नानासाठी गर्दी नाही… इंद्रायणी घाट आणि अलंकापुरी केवळ सुनीसुनीच आहे.
आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा जीव की प्राण. या वारीची लाखो वैष्णवजण आतुरतेने वाट पाहत असतात. तर आषाढी वारीच्या साधारणत: 17 दिवस आधी अलंकापुरीतून माउलींचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. त्यामुळे जवळपास 20 ते 22 दिवस अगोदरपासून अलंकापुरीत भक्तीचे मळे फुलतात. तर ज्येष्ठ अष्टमीला माउलीचे दरवर्षी प्रस्थान होते. त्यामुळे षष्ठी व सप्तमीला अलंकापुरीसह इंद्रायणी घाटावर केवळ भक्तीचे मळे फुलले असतात. अलंकापुरीत केवळ माउली… माउली.. हा एकच शब्द कानी पडत असतो.
मात्र, यंदा करोनामुळे पायी वारी रद्द केली असून मंदिरही बंद असल्याने यंदा अलंकापुरीत येणारा वैष्णवांचा ओघ थांबला आहे. दरवर्षी माउलींचे प्रस्थान होण्याच्या आठ दिवस आधीपासून वारीसाठी दिंड्या आणि हजारो वारकरी अंलकापुरीत दाखल होत असतात. तसेच प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक दाखल होत असतात. पवित्र इंद्रायणीकाठ वारकऱ्यांनी गजबजून निघालेला असतो.
तर इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानपूर्वीचा आनंद मनसोक्त लुटत असतात. टाळ-मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण अलंकापुरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेली असते; मात्र यंदा असे काहीच चित्र नसल्याने माउलींनी स्वत:ला लॉकडाऊन करून घेतल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
अवघ्या एक दिवसांवर प्रस्थान
भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत दिंडी व पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी आळंदीनगरीत दाखल होत असतात; मात्र यंदा पालखी सोहळ्याचे प्रस्थान अवघ्या एका शनिवार (दि. 13) दिवसांवर आले असूनही अंलकापुरीत नीरव शांतता आहे.
…मात्र आनंद कमी नाही
यंदा मोजक्या व्यक्तींना घेत प्रस्थान सोहळा पार पडणार असल्याने आळंदीत वारकऱ्यांची गर्दी कमी असली तरी प्रस्थानचा आनंद कमी झाला नाही. प्रत्येक वारकऱ्याने आत्मभान आणि समाजस्वास्थ्यासाठी आळंदीत न येता राज्य सरकारच्या सूचनेस प्रतिसाद दिला. आणि स्वत:च्या घरातच ज्ञानेश्वरही पारायण, हरि भजन करत यंदाची वारी पार पाडायचा निश्चय केला आहे. यामुळे यंदाचा सोहळा वारकऱ्यांच्या गर्दीशिवाय पार पडणार असला तरी आनंद काही कमी नाही.
माउलींनी करून घेतले क्वारंटाइन
आळंदीत करोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून शहरातील हा पहिला रुग्ण आणि मृत्यू ठरला आहे. तर संबंधित महिला मंदिर परिसरातील असल्याने ती राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र केले आहे. त्यामुळे प्रस्थानाआधी गर्दी जमू नये यासाठी माउलींनी स्वत:लाच क्वारंटाइन करून घेतल्याची चर्चा सर्वत्र आहे.