आळंदी, – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी वारी सोहळा मंगळवार (दि. 5) पासून सुरु होत आहे. शनिवार (दि. 9) कार्तिकी एकादशी तर सोमवार (दि. 11) संजीवन समाधी दिन आहे. या सोहळ्याला देश-राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. यात्रेत दर्शनासाठी लागणारा वेळ पाहता आणि गर्दी टाळण्यासाठी काही भाविक हे एकादशीपूर्वीच दर्शन घेऊन परतत असतात. आज रविवार (दि. 3) माऊली मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. जवळपास 30 हजार भाविकांनी माऊलींचे समाधी दर्शन घेतले अशी, माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
रविवार आणि लग्नाची तारीख
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने परिसरासह राज्यातील हजारो भाविक आज आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. तसेच लग्नाची तारीख आणि आळंदीत मोठ्या प्रमाणात मंगलकार्यालये असल्याचे वऱ्हाडी मंडळींची आळंदीत मोठी संख्या होती. माऊली मंदिर परिसरासह प्रदक्षिणा रोडवर लोकांची गर्दी होती.
माऊली मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात –
मंगळवारी श्री गुरू हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होणार असली तरी आजपासून माऊली मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पहाटे 3 ते 5 वेळेत श्रींना पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11.30 माऊलींच्या चल पादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 1 वाजता महानैवेद्य, सायंकाळी 6 ते 8 ह.भ.प. मुक्ताई फडातर्फे वीणा मंडपात कीर्तन सेवा, रात्री 8 ते 8.30 धुपारती, 11 ते 11.30 शेजारती असे विविध धार्मिक कार्यक्रम होते.
समोवारी हैबतबाबा दिंडीचे आगमन
पंढरपूरहून प्रस्थान झालेल्या श्री गुरू हैबतबाबा यांच्या दिंडीचे सोमवारी (दि. 4) आळंदीत आगमन होणार आहे. तर मंगळवारी (दि. 5) श्री पांडुरंग आणि संत नामदेव महाराज पालखीचे अलंकापुरीत आगमन होणार आहे. दोन्ही पालख्यांसोबत इतर ठिकाणाहून संत महंतांच्या दिंडी, फडकरी परंपरेच्या दिंडींचे आगमन होणार आहे.