दहिवडी, (प्रतिनिधी)- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा 9 ते 23 एप्रिल याकालावधीत होत असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सर्व प्रशासकीय विभागांना दिले. भाविकांनी शांततेचे सहकार्य करून यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
शिंगणापूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीस प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, माणचे तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शिंगणापूर सरपंच सारिका शेंडे, उपसरपंच राजेंद्र पिसे, माजी सरपंच राजाराम बोराटे, देवस्थानचे व्यवस्थापक मंदार पत्की, कावडीधारक भाविक यासह माण, फलटण, माळशिरस विभागातील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी झालेल्या बैठकीचा मागोवा जिल्हाधिकारी दुडी यांनी घेतला. शिंगणापूर यात्रा ऐन उन्हाळ्यात असल्याने यात्रेसाठी 40 टँकरचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागास दिले.
आरोग्य विभागाची 5 आरोग्य पथके, 78 कर्मचारी, 6 रुग्णवाहिका यात्रेसाठी तैनात असून 2 लाख ओआरएस पाकिटे तसेच मोठया प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. अत्याधुनिक सुविधेसह एक रुग्णवाहिका, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यात्रा परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने 200 सफाई कामगार, 100 फिरती शौचालये देण्यात येणार असून ग्रामपंचायत व देवस्थान समितीने स्वच्छतेबाबत कार्यवाही करावी.
एसटी महामंडळाने भाविकांसाठी सुस्थितीतील 200 जादा बसेस उपलब्ध करून घ्याव्यात, बसेसची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी. सोलापूर व फलटण मार्गावर योग्य प्रकारे वाहतुकीचे नियोजन करण्याचे आदेश एसटी विभागास दिले.
वीज कंपनीने यात्राकाळात 24 तास वीजपुरवठा सुरू ठेवावा, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग तसेच देवस्थान समितीने वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे यात्रेपूर्वी काढून टाकावीत. शिंगणापूरकडे येणाऱ्या कोथळे रस्त्याची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अन्न व औषध प्रशासनाचे पथक तैनात करावे, शासकीय व खासगी मोबाइल कंपन्यांनी क्षमता वाढवावी असे आदेश जिल्हाधिकारयांंनी दिले.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसर, मुंगीघाट परिसर, यात्रा परिसराची पाहणी करून भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या.