पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचे हे काही वृत्त समोर आले होते. यातच आता अजित पवार यांनी सासवडमधील कार्यक्रम अचानक रद्द केला आहे. ते सासवडमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार होते. पण आता या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. आयत्या वेळी अजित पवार यांनी कार्यक्रम रद्द केल्याने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे. यावरून अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अधिक रंगू लागल्या आहेत. मात्र अजित पवार नाराज नसल्याचे सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार अजिबात नाराज नाहीत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची जी सभा झाली त्या सभेत जयंत पाटील बोलले नाहीत मग ते नाराज होते असं म्हणायचं का? मविआच्या प्रत्येक सभेत दोनच जण बोलणार हे आधीपासूनच ठरलं होतं. अजित पवार हे नाराज असल्याच्या सर्व अफवा आहेत.”
काय म्हणाले संजय राऊत ?
“अजित पवार काल आमच्याबरोबर नागपुरमध्ये सभेसाठी आले होते. त्यांचा काल आमच्याबरोबर चांगला संवाद झाला होता. नागपुरातून मुंबईला येताना अजित पवार आमच्याच विमानात होते. मला अजिबात वाटत नाही की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगळ्या दिशेने जातील. त्यांच्या भूमिका परखड आहेत. ते स्पष्ट बोलतात. काल रात्री ते स्वत: उद्धव ठाकरेंसोबत नवी मुंबईतील रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करण्यासाठी गेले होते,” असे संजय राऊत म्हणाले.