मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील या घटने प्रकरणी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हती त्यामुळे कडक उन्हात हा कार्यक्रम झाला. लाखो भक्तांची सोय किंवा व्यवस्था न पाहता गृहमंत्री अमित शहा यांची वेळ पाहिली गेली. सहा तासाच्या वर श्री सदस्य बसून होते. त्यांचा कुठलाही विचार सरकारने केला नाही, फक्त व्यासपीठावर असलेल्या लोकांचा विचार केला. सर्व व्हीआयपी छपराखाली होते अप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक तळपत्या उन्हात बसले होते. ”
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही मानतो, त्यांच्या बद्दल आम्हाला आदर. पण श्री सदस्य मोठ्या प्रमाणात येणार असताना कडक उन्हात ते बसून होते आयोजकांनी त्यांची व्यवस्था केली नाही. त्या सेवत सहभागी होणाऱ्या भक्तांना ज्या यातना झाल्या त्यांचा मृत्यू झाला हे अतिशय दु:खद आहे. सहा तास उन्हात बसलेल्यांची सोय न पाहता आप्पासाहेब वगळता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता त्यांच्या कुरघोड्या सुरु होत्या’, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“तो संपूर्ण समुदाय आप्पासाहेबांचा होता राजकीय नाही. सरकार मध्ये अनेक तज्ज्ञ लोकं असतात. त्यांना याबाबत विचारायला पाहिजे होते उष्माघातामुळे झालेला मृत्यू बघता ही बाब गंभीर आहे. त्याबाबत चौकशी केली पाहिजे. राजकीय लोकांच्या अट्टाहासामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आयोजकांच्या जबाबदारीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय घडलं ?
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते. मात्र तळपत्या उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 123 हून अधिक लोकांना तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.