मुंबई : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणामुळे ठाण्यासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. “महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी “मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला” असे प्रत्युत्तर दिले. यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
अजित पवार यांनी ‘फडतूस आणि काडतूस’ वरील वादावरून उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला. साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी,“काहींना माईक हातात आल्यावर काय बोलावं? तेच कळत नाही. कोण फडतूस म्हणतं, तर कोण काडतूस म्हणतं. कुणी काहीही म्हणतं. अरे आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी चांगले विचार दिले आहेत.”
तसेच “संयुक्त महाराष्ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती केली. त्या रस्त्याने आपण जायला हवं. वसंतदादा नाईक, शरद पवार यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जायला हवं. तो रस्ता आपल्या भल्याचा आहे. आपल्याला निश्चितपणे दिशा देणारा आहे. त्याचा विचार आपण करायला हवा. या गोष्टी सोडून राज्यात नको त्या गोष्टी सुरू आहेत.”असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शरद पवारांनी अदाणी प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. हिंडेनबर्ग कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य केल्याचे दिसतं, असे विधान केले होते. यानंतर आता अजित पवारांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.