अकोला – अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही नेते मंडळींनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतली. या सगळ्या घडामोडी झाल्याने शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट निर्माण झाले. एक म्हणजे अजित पवार गट आणि दुसरा म्हणजे शरद पवार गट.
मात्र यादरम्यान अनेकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा रंगल्या. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
शरद पवार यांच्या आजच्या अकोला दौऱ्यानंतर त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. “अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या गळ्यात पहिला हार घालणारी मी असेल, कारण बहिण म्हणून माझ्या त्याच्यावर जास्त हक्क आहे” असं विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले, “पण हे एक स्वप्नच आहे. ही काही घडणारी गोष्ट नाही, ” असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार गटाला माझा कसा पाठिंबा असू शकतो -शरद पवार
“आमची भूमिका स्वच्छ आहे. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. जे गेले ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. राष्ट्रवादीचं चिन्ह वापरलेल्या अजित पवार गटाला माझा कसा पाठिंबा असू शकतो. राष्ट्रवादीमधून भुजबळ निवडून आले आणि भाजपात गेले. पवार पुढे म्हणाले की, खोटं बोलून छगन भुजबळ शपथविधीला गेले, हे त्यांनीच कबुल केलं आहे. आमच्या चेहऱ्यावर हे निवडून आले आणि भाजपात गेले त्यांना काय बोलणार”, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.