नगर(प्रतिनिधी) – बर्याच दिवसाच्या मागणीनंतर बहुचर्चित अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराला आता प्रशासकीय पातळीवर चालना मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता थेट मंत्रालयातूनच आदेश आल्यानंतर जिल्हाधिकार्यांसह मनपाची प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. तसा अहवाल जिल्ह्याधिकार्यांना मनपाकडून सादर करण्यात आल्याने आता अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन त्याचे नाव अहिल्यादेवीनगर ठेवण्यावर ‘शिक्कामोर्तब’ झाल्याचे अधोरेखित झाले आहे. बर्याच दिवसांची मागणी आता पूर्ण होणार असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करावे, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी (ता. जामखेड) येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहमदनगरच्या नामांतरणाची घोषणा केली. त्यामुळे नामांतराच्या मागणीला वेग आला. आता जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी महापालिका प्रशासनाने महासभा घेत नामांतरचा ठराव घेऊन जिल्हाधिकार्यांना पाठविला आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर नामांतराच्या हालचालींना वेग आला आहे.
अहमदनगर महापालिकेची सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये अहमदनगर शहराचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठविला आहे.
-डॉ. पंकज जावळे, आयुक्त तथा प्रशासक.
राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद बीड जिल्ह्यांच्या नामांतरानंतर अहमदनगर नामांतराच्या मागणीला जोर आला. त्याचबरोबर आमदार प्रा.राम शिंदे व आ.गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरणासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, मागील वर्षी चौंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या नामांतरणाची घोषणा केली. गेल्या वर्षभरात याबाबत विशेष काही प्रशासकीय पातळींवर हालचाली होताना दिसल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामंतरणाच्या हालचालींना वेग आला आहे.
राज्य सरकारने जिल्हाधिकार्यांना आदेशदेऊन उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांकडून समजते. राज्य सरकारकडून निर्देश आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांना तातडीने ठराव संमत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी तातडीने महासभा बोलविली. या सभेला अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे उपस्थित होते.