नगर (प्रतिनिधी) – राज्य शासनाकडून बाबुर्डी घुमट येथे 32. 95 हेक्टर (83 एकर) परिसरात 18 हजार स्क्वेअर फुटाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या इमारतीचे रविवारी (दि. 3) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
उपकेंद्रासाठी पहिल्यांदाच सुसज्ज इमारत बांधण्यात आली असून, उपकेंद्रात जर्मन भाषेसह तीन पदवी अभ्यासक्रमास सुरूवात होणार आहे. बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथे उपकेंद्र इमारतीचे रविवारी सकाळी 10 वाजता उदघाटन होणार आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अध्यक्षस्थानीकुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, उपकेंद्र संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी यांच्यासह आयोजन आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
डॉ. विखे म्हणाले, विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राची स्थापना 1986-87 मध्ये झाली. जिल्हा कार्यक्षेत्र या उपकेंद्राचे राहणार आहे. या अंतर्गत महाविद्यालये आणि परिसंस्थांची संख्या 163 आहे, 2 हजार शिक्षक तर 1 लाख 25 हजार विद्यार्थी राहणार आहेत. या पत्रकार प्रसंगी सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे आदी उपस्थित होते.
नगर | जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू
शैक्षणिक वर्षात 4 वर्ष डाटा सायन्स कोर्सला मान्यता मिळालेली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर ए. आय. इंडस्ट्रीयल जोरिएंटेड कोर्सेस, मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस सुरू करणे प्रस्तावित आहे. वसतिगृह नियोजित आहे. सर्व सोई सुविधांचा लाभ विद्यापीठ उपकेंद्रात उपलब्ध करुन देऊन विद्यापीठावरील कामाचा ताण कमी करण्याचा मानस आहे, असे विखे म्हणाले. एक हजार विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन प्लेसमेंट केली जाणार आहे.
अशा असतील सुविधा…
परीक्षेच्या केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून आलेल्या उत्तर पुस्तिकांचे संकलन करून त्वरित विद्यापीठाकडे पाठविणे, विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी सॉफ्ट स्कील्ससारखे शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, विद्यापीठातर्फे राबविण्यात येणार्या नवीन योजना व ध्येयधोरणे जिल्ह्यातील महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, शिबिरे, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग आदींचे आयोजन करणे.