नगर – नगर अर्बन बॅंकेत ठेवीदारांच्या अडकलेल्या कोट्यवधी रुपयांच्या प्रश्नास राजकीय वळण देण्यात येत असून माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी जिल्हा सहकारी बॅंकेवर घोटाळ्याचा आरोप केल्याचा दावा बॅंक बचाव कृती समितीचे प्रमुख व नगर अर्बन बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला आहे.
भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांनी नगर अर्बन बॅंकेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यामुळे या बॅंकेचा बॅंकींग व्यवसायाचा परवाना रद्द झाल्यानंतर बॅंकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांनी दोन दिवसांपूर्वी (स्व.) दिलीप गांधी यांच्या घरावर मोर्चा नेला. त्यावेळी त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधींशी त्यांचा वाद झाला.
त्यानंतर सुवेंद्र गांधींनी जिल्हा बॅंकेतील घोटाळ्यांकडे का दुर्लक्ष होते, असा सवाल उपस्थित केला आहे. यावर बॅंक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी जोरदार टीका केली. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी व त्यांच्या परिवाराने स्वतःचे कोटक महिंद्रा बॅंक, भैरवनाथ पतसंस्था व युनियन बॅंकेतील कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी नगर अर्बन बॅंकेत सस्पेंस खात्याचा घोटाळा व चिल्लर घोटाळा केल्याचे पुरावे आहेत व तसे गुन्हेही दाखल झाले आहेत.
म्हणजे स्वतः घोटाळेबाज असताना जिल्हा सहकारी बॅंकेवर घोटाळ्यांचा आरोप करण्याचे धारिष्ट्य सुवेंद्र गांधींनी करणे हे आश्चर्यच आहे. त्यांचे असे वक्तव्य म्हणजे नगर अर्बन बॅंकेच्या प्रश्नास राजकीय वळण देण्याचाच प्रयत्न आहे व त्याचा जाहीर निषेध करीत आहोत, असे राजेंद्र गांधी यांनी स्पष्ट केले. सुवेंद्र गांधी यांनी ठेवीदारांच्या मोर्चामागे राजकीय षडयंत्र असून जिल्हा सहकारी बॅंकेत मोठे घोटाळे होत आहेत, तिथे कोणी मोर्चा काढत नाही, असे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. ठेवीदारांचे पैसे नगर अर्बन बॅंकेत अडकल्यामुळे ते नगर अर्बन बॅंकेच्या पदाधिकार्यांना पैसे मागणार. यात जिल्हा सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यांचा काय संबंध, असा सवाल केला.