नगर, (प्रतिनिधी) – नगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील फाॅरेन्सिक ऑडीट नुसार संशयित आरोपींची संख्या १०५ झाली असून फॉरेन्सिक ऑडीट करणार्या कंपनीकडून अद्यावत अहवाल मागितला आहे. त्यामुळे यात आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल झाल्याने सुमारे ५८ संशयित आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली असल्याचे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.
नगर अर्बन बँक बचाव समिती, ठेवीदार, बँक अवसायक, पोलीस यांची संयुक्त बैठक शनिवार (दि. १७) रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली. या बैठकीला अवसायक गणेश गायकवाड, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांच्यासह ठेवीदार, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला राजेंद्र गांधी यांनी ठेवीदारांना त्यांच्या पाच लाखाच्या पुढील ठेवी परत मिळण्यासाठी अवसायक व पोलिसांनी प्रयत्न करावे, ठेवीदारांना दोघांकडून खूप अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली.
नगर अर्बन बँकेतील पाच लाखाच्या पुढील ठेवी देण्यासाठी बँकेला सुमारे पावणे दोनशे कोटीची (१७५ कोटी) गरज आहे. कर्जदारांकडून वसूली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत ४ कोटी २५ लाख वसूल झाले आहे. बँकेकडे सध्या 40 कोटी शिल्लक आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर परत मिळून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. बँकिंग व्यवहाराचा परवाना रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी रद्द केला असून त्या दिवसापर्यंत खातेदारांच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कमच त्यांना परत करण्यात येणार असल्याचे बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी अवसायक गायकवाड म्हणाले, माझी अर्बन बँकेवर अवसायक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर केवायसी पूर्ण करण्यावर भर दिला आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना डिपॉझिट गॅरंटी कार्पोरेशन (डीआयसीजीसी) मार्फत पैसे मिळणार नाही. सध्या ११ हजार ३५६ खातेदारांचे केवायसी पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही बँकेत ठेवी ठेवल्या त्या आम्हाला परत मिळत नाही. मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपणासाठी पैशाची आवश्यकता असल्याची भावना उपस्थित ठेवीदारांनी या वेळी व्यक्त केली. यावर अवासयक गायकवाड यांनी सांगितले की, बँकेच्या १७ शाखा बंद करण्यात आल्या असून त्यापोटी खर्च होणार्या पैशाची बचत होणार आहे. वसूलीसाठी पथके तयार करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत वसूलीवर भर देण्यात आला आहे. कमीत कमी वसूली करण्याचा प्रयत्न केला तरीही ४00 कोटी वसूल होणार आहे. प्रत्यक्षात ठेवीदारांना देण्यासाठी पावणे दोनशे कोटींची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व ठेविदारांना त्यांचे पैसे मिळून देऊ, असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.