शिर्डी – शिर्डीच्या पावन भूमीला माझा कोटी कोटी प्रणाम, साईबाबांचे दर्शन घेण्याची मला दुसऱ्यांदा संधी मिळाली. 2017 मध्ये मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हा मी शिर्डीला आलो होतो. तेव्हा दर्शन रांगेसह शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. आता त्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील मी केले हे माझे भाग्य असून त्यामुळे साईबाबांचे दुसऱ्यांदा दर्शन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले.
नगर येथील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन, महिला व बाल रूग्णालयाचे भूमिपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मीनल बिल्डिंगचे भूमिपूजन, कुर्डुवाडी – लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी); एनएच-166 (पॅकेज-1) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
पंतप्रधानाच्या हस्ते आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे लाभार्थ्याना वाटप करण्यात आले. तसेच राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ.भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामीणविकास मंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार उन्मेश पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, श्रीमती रक्षा खडसे, आ.बबनराव पाचपुते, आ.राम शिंदे, आ.मानिका राजळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदीजींच्या सबका साथ सबका विकास हा मंत्र साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणे आहे. महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्राचा विचार केला. विकासाचा समान धागा माणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या पार्श्वभूमीचा विचार करुन, निळवंडे धरणाचे लोकार्पण ही या भागातील शेतकऱ्यांची स्वप्नपुर्ती आहे. आता पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारने पाठबळ देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.