कोपरगाव -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर आले असता, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काकडी (ता.कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळावर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
यावेळी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत करून कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकार सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असल्याचे सांगून निळवंडे धरण, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विविध विकासकामे मार्गी लावल्याबद्द्ल कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांनी सरकारचे आभार मानले. स्व. शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील 11 गावांचा निळवंडेच्या लाभक्षेत्रात समावेश झाला आहे. या धरणाचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचल्याने हा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. निळवंडेच्या पाण्यासाठी गेल्या पाच दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे, असेही त्या म्हणाल्या.