गांधीनगर – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला गुजरात राज्यातूनही आता झटका बसला आहे. त्याचे कारण म्हणजे या राज्याच्या आदिवासी बहुल भागातील राज्यसभेचे माजी खासदार आणि तब्बल पाच वेळा छोटा उदेपूर येथून लोकसभेवर निवडून गेलेले नेते नारायण राठवा (Congress leader Naran Rathwa) आणि त्यांचे पुत्र व युवक कॉंग्रेसचे नेते संग्रामसिंह राठवा ( Sangramsinh Rathwa) यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम केला आहे.
कॉंग्रेस पक्षातच न्याय नाही – राठवा
या दोघांनी मंगळवारी गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षामध्ये निर्णय घेण्याची उणीव असल्यामुळे निराश होत आम्ही भाजपमध्ये दाखल झालो असल्याचा दावा त्यांनी केला.
एका इंग्रजी माध्यमाच्या संकेतस्थळावर दिलेल्या बातमीनुसार संग्रामसिंह राठवा म्हणाले की, कॉंग्रेसच्या संदर्भात मुख्य मुद्दा हा आहे की एकदा पराभव झाल्यानंतर पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी कामाला लागण्यास ते असमर्थ आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या पक्षात निर्णय घेणे अथवा प्रयत्न करण्याची क्षमताच नाही.
राहुल गांधी देशभर न्याय यात्रेवर आहेत. मात्र कॉंग्रेस पक्षातच कोणता न्याय नाही. सुशिक्षित युवकांना पक्षात कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. या पक्षाकडे युवकांचा एक मोठा जनाधार होता. मात्र त्यांचा उत्साह वाढवणारे, प्रेरणा देणारे कोणतेही पाठबळ अथवा समर्थन पक्षाकडून मिळाले नाही.
जड अंत:करणाने निर्णय –
संग्रामसिंह पुढे म्हणाले की, पक्ष सोडण्याचा निर्णय अगदी जड अंत:करणाने घेतला असून ज्या पक्षाशी एवढी वर्षे तुम्ही जोडले गेलेले असतात तो पक्ष सोडणे सोपे नसते. तो पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नसते, मात्र दुसरा कोणता पर्यायच शिल्लक नव्हता.
वर्षागणिक पार्टी दुबळी होत चालली आहे आणि अधिक असंघटित होत चालली आहे. ते नैतिकदृष्ट्या कार्यकर्त्यांना तोडण्याचे काम करत आहेत. ते पुढे म्हणाले की, राममंदिर सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय चुकीचे निर्णय घेण्याचीच क्षमता सिध्द करतो. आपण लोकांचे नेते आहोत आणि पक्षाला हे समजले पाहिजे की त्यांचा लोकांची भावना ही त्यांच्या अहंकारापेक्षा मोठी आहे.
कॉंग्रेस अपयशी ठरतेय –
त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे जेंव्हा आमंत्रण मिळाले होते तेंव्हा कॉंग्रेसने त्याचे स्वागत करायला हवे होते. त्या निर्णयाचा आदर करायला हवा होता, कारण कॉंग्रेसनेच सगळ्यांत प्रथम मशिदीचे कुलूप तोडले होते. मात्र अशा क्षणांचा लाभ घेण्यात कॉंग्रेस अपयशी ठरते आहे.
नारायण राठवा हे १९८९ ते १९९८ दरम्यान चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. १९९९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २००४ मध्ये ते पुन्हा विजयी झाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळही पूर्ण केला आहे. आता त्यांनी आणि त्यांच्या पुत्राने कॉंग्रेसची साथ सोडली आहे.