मुंबई – महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत भाजपचे खासदार घटणार आहेत. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 22 ते 25 च्या पुढे भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांची संख्या जाऊ शकत नाही, असा अहवाल माजी मंत्री विनोद तावडे यांच्या तीन सदस्यीय समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाजप पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे.
त्यानंतरच राज्यात “ऑपरेशन लोटस’ सुरू झाले असल्याची माहिती आहे. त्यातूनच विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. केवळ अजित पवारच नव्हे तर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांवरही भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची एक समिती तयार करण्यात आली होती.
या समितीने संपूर्ण भारतात भाजपची लोकसभा जागांबाबत काय स्थिती आहे, त्याचा अहवाल द्यायचा होता. त्या समितीने महाराष्ट्राच्या संदर्भात दिलेला अहवाल नकारात्मक होता. त्यात महाराष्ट्रातील जागा घटतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून 42 खासदार निवडून आणण्यात भाजपाला यश आले होते.
मात्र, लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत खासदारांची संख्या घटेल, असे अहवाल म्हटले आहे. खासदारांची संख्या दोन आकड्यात घटण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे 22 ते 25 च्या वर खासदार निवडून येणार नाहीत, असेही तावडे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
“ऑपरेशन लोटस’ला सुरवात
तावडे समितीचा अहवाल भाजप पक्षश्रेष्ठींनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. त्यानंतर पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून अजित पवार नॉट रिचेबल असणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तातडीने दिल्ली गाठणे, या सर्व घडामोडींवरून राज्यात “ऑपरेशन लोटस’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या ऑपरेशन लोटसमध्ये केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नव्हे तर कॉंग्रेस पक्षाचे नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेच्या 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये भाजपचे होणारे 15 ते 18 खासदारांचे नुकसान टाळण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.
कर्नाटक भाजपमध्येही संख्या घटणार?
तावडे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपच्या लोकसभेच्या जागा घटण्याची शक्यता आहे. यातील महाराष्ट्र आणि कर्नाटकात भाजप व त्यांच्या मित्रपक्षाच्या मदतीचे सरकार आहे. बिहारमध्ये मात्र यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केले आहे. या तीनही राज्यात भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचे खुद्द पक्षाने नेमलेल्या समितीने म्हटले आहे.