नवी दिल्ली – प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट चित्तानंतर आता प्रोजेक्ट डॉल्फिन हातात घेण्यात येणार आहे. वन व पर्यावरण मंत्रालयाने याचा आराखडा तयार केलेला आहे. दरम्यानच्या काळात देशातील नद्यांमध्ये असणाऱ्या डॉल्फिन माशांची संख्या मोजण्याचे काम वेगाने सुरू आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रोजक्ट टायगर आणि प्रोजेक्ट चित्ता नंतर आता प्रोजेक्ट डॉल्फिनही लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी देशभरातील नद्यांमधील डॉल्फिनची अचूक संख्या समजण्यासाठी त्यांच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. असे मानले जाते की, देशभरातील नद्यांमध्ये डॉल्फिनची संख्या सुमारे दोन हजारांपर्यंत असावी.
डॉल्फिन प्रोजेक्टचा आराखडाही टायगर प्रोजेक्टच्या धर्तीवर केला जात आहे. टायगर प्रोजेक्ट करताना जंगलातील वाघांबरोबरच जंगल आणि जंगलातील अन्य प्राण्यांचा विचार करण्यात आला होता. त्यामुळे आता त्याठिकाणी वाघांबरोबरच अन्य प्राण्च्या संख्येतही वाढ झाली आहे. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे चार वर्षांत बिबट्यांची संख्या तब्बल 60 टक्क्यांनी वाढलेली आहे.
डॉल्फिन माशांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. ज्या मध्ये केंद्र सरकारच्या अकरा मंत्रालयांबरोबरच सगळ्या राज्य सरकारांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रत्येकाची भूमिका निश्चित करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये जलशक्ती, पर्यटन, संरक्षण, कृषी, पशुपालन-डेअरी व मत्स्यपालन, उर्जा मंत्रालय यांचा समावेश आहे.
पाण्यातील अन्य प्राण्यांसाठी नियोजन
वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या सांगण्यानुसार या आराखड्यात डॉल्फिनच्या संरक्षणाबरोबरच नद्यांमध्ये राहणाऱ्या अन्य जलचरांच्या संरक्षणावरही काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प फक्त प्रमुख नद्यांपुरता मर्यादित ठेवण्यात येणार नाही. उलट त्यामध्ये छोट्या आणि मध्यम नद्यांचाही समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर भारताच्या समुद्री सीमांच्या कक्षेत असणाऱ्या डॉल्फिनच्या संरक्षणावरही लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी किनारा रक्षक दलालाही या मोहिमेत जोडण्यात आलेले आहे.
दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषण करताना प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू करण्याची घोषणा केली होती. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने सुरवात झालेली आहे. या प्रकल्पात सध्या गंगा नदीबरोबरच व्यास, घाघरा, गंडक, यमुना, नर्मदा, कावेरी, महानदी, चंबळ, सोन या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याठिकाण्या डॉल्फिन माशांची गणना करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर भारताच्या समुद्री सीमांच्या कक्षेतील डॉल्फिनची देखील मोजणी करण्यात येत आहे. त्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेण्यात आलेली आहे.
मोजणीनंतर नद्यांच्या प्रवाहात डॉल्फिन अभयप्रवाह तयार करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर अन्य नद्यांमध्ये असे अभयप्रवाह तयार करण्याची तयारी झालेली आहे. सध्या देशात फक्त गंगा नदीच्या प्रवाहात भागलपूर ते सुल्तानगंज दरम्यान असा अभयप्रवाह तयार करण्यात आलेला आहे. देशात सर्वाधिक डॉल्फिन याच भागात पाहायला मिळतात.