नाशिक :- राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली. सध्याच्या सरकारमध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. सरकारमध्ये सर्वाधिक योगदान हे भाजपचे नाही, असे या जाहिरातीमधून समोर आले, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या जाहिरात प्रकरणावर प्रथमच भाष्य केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिवसेना आणि भाजपमधील जाहिरात वादावर भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, आमचा समज होता की, हे जे सरकार बनलं आहे त्यात मोठा वाटा किंवा मोठी संख्या भाजपाची आहे. मात्र, जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली की, भाजपाचे योगदान यात जास्त नाही. जास्त योगदान अन्य घटकांचं आहे आणि हे कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, असा टोलाही लगाविला.
दुसरीकडे कर्नाटकमध्ये हेडगेवारांचे धडे काढले आहेत. त्यावर बोलताना लहान वयात मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. कॉंग्रेसने जाहिरनाम्यात सांगितले होते. त्यावर जनतेने बहुमत दिले आणि ते आता पूर्ण करत आहात, असे म्हणत पवारांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच समान नागरी कायद्यापेक्षा देशातील वाढत्या समस्यांकडे केंद्र सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला.
देशात परिवर्तनचे वातावरण..
संपूर्ण देशात परिवर्तनचे वातावरण आहे. लोकांना हल्लीच्या राजकारणात सत्ता देऊ नये असे वाटते. देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा कुठे भाजप आहे हे कळेल. मध्यप्रदेशमध्ये भाजपची सत्ता नव्हती, पण खोके दिल्यामुळे सत्ता आली आहे. मोठी आश्वासने द्यायची आणि पूर्ण करायची नाही, बेरोजगारी याकडे लक्ष न दिल्याने बदल होऊ शकतो, असेही पवार म्हणाले.