मुंबई :- बीसीसीआयचे अध्यक्ष असताना माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिवलाल यादव यांनीच पुत्रप्रेमापोटी माझ्यावर अन्याय केला, असा गौप्यस्फोट अम्बाती रायडू याने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवलाल यांच्या मुलापेक्षा मी जास्त चांगला खेळत होतो. मात्र, त्यांना त्यांच्याच मुलाला पुढे आणायचे होते, त्यामुळेच मला सातत्याने डावलण्यात आले, असा आरोपही रायडूने केला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अखेर गुणवत्ताच जिंकली व शिवलाल यांच्या मुलाचा काय दर्जा होता ते सगळ्यांना उमगले व त्यानंतर मला जास्त संधी मिळाली. मात्र, सुरुवातीच्या काळात हा अन्याय झाला नसता तर माझी कारकीर्द आणखी चमकदार ठरली असती. मी लहान असताना हैदराबाद क्रिकेट संघटनेत राजकारण सुरू झाले.
शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याला भारतीय संघात स्थान देण्यात आले व मला डावलले गेले. मी अर्जुनपेक्षा चांगला खेळत होतो, त्यामुळेच त्यांनी मला हटवण्याचा प्रयत्न केला गेला. 2003-04 मध्ये मी भारताच्या अ संघासाठी चांगली कामगिरी केली होती, पण 2004 साली निवड समिती बदलली आणि शिवलाल यादव यांच्या जवळचे लोक त्यात आले, त्यामुळे मला संधी मिळाली नाही, असेही रायडू म्हणाला.
अखेर या तणावाला व अन्यायाला कंटाळून मी हैदराबाद सोडून आंध्र प्रदेशकडून खेळू लागलो. मात्र तिथेही आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार प्रसाद यांच्याशी त्याचे मतभेद झाले आणि पुन्हा हैदराबादमध्ये यावे लागले, असेही रायडू म्हणाला.
प्रसाद यांनीही डावलले…
2010 साली मी आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स संघाकडून खेळत होतो. एक यष्टीरक्षक म्हणून खेळताना अनेक महत्त्वाच्या खेळी करत संघासाठी योगदान दिले. मात्र, 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडताना माझ्या जागी दुय्यम कामगिरी केलेल्या विजय शंकरला संघात घेतले. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद होते व त्यांनीच मला शब्द दिला होता. मात्र, तो पाळला नाही, असेही रायडूने म्हटले आहे.