पाटणा : – विरोधी पक्षांच्या ऐक्याला गती मिळण्याच्या भीतीतून भाजप या देशात लोकसभेच्या निवडणुका नियोजित वेळेपेक्षा आधी घेण्याची शक्यता आहे असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना कुमार यांनी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या पक्षाची सत्ताधारी ‘महागठबंधन’ मधून हकालपट्टी केल्याच्या निर्णयाचेही समर्थन केले आहे. जीतनराम मांझी हे भाजपच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षांची हेरगिरी करत होते असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका वेळे आधीच होण्याची शक्यता मी आधी सहजपणे व्यक्त केली होती. पण विरोधी ऐक्याला गती मिळाल्यामुळे भाजप धास्तावला आहे. ते असाच निर्णय घेण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
भाजपच्या विरोधात असलेले सर्व विरोधी पक्षांचे नेते 23 जून रोजी पाटण्यात एकत्र येत आहेत. त्यातून विरोधकांची एक मजबूत आघाडी स्थापन होईल असे ते म्हणाले.
रत्नेश सदा यांच्या शपथविधीनंतर नितीशकुमार राजभवनात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जीतनराम मांझी यांच्या बदलत्या निष्ठेवरही जोरदार टीका केली.