नगर – प्राथमिक शिक्षकांनी मोबाईलचा वापर अध्यापनासाठी करावा व त्याची नोंद ठेवावी.मात्र त्याव्यतिरिक्त शाळेच्या वेळात मोबाईलचा वापर केल्यास संबंधीत गुरुजीवर कारवाई होईल,असा इशारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने दिला आहे.
उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.6 शिक्षण समितीची सभा झाली. या सभेत विविध विषयांवर सदस्यांची खडाजंगी झाली.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतबाबत जिल्ह्यातील सराव परीक्षेमध्ये जासत गुण असलेल्या 100 विद्यार्थ्यांची निवड करून निवासी कार्यशाळा नेवासा येथे दोन दिवसांची घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेच्या सुरवातीलाच सुपर शाळा तसेच दप्तरमुक्त शाळा यांचा अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी मांडला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी या ठरावाबरोबरच जिल्ह्यातील ज्या ज्या शाळा उपक्रमशिल आहेत, त्यांचाही अभिनंदनाचा ठराव करून त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी अभिनंदाचे पत्र द्यावे, मुद्दा मांडला. सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली.
उन्हाळ्याच्या सुटीत किती शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यात आला असून त्याचा किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला याची माहिती सभागृहात द्यावी, अशी मागणी जालिंदर वाकचौरे यांनी केली. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी 124 शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्यात आल्याचे स्पष्ट केले. परंतु वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांची आकडेवारीची मागणी केली.
ति येत्या दोन ते तीन दिवसात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर भरारीपथके तयार करून शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याही तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.