पुणे – शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सहजासहजी यश कधीच मिळत नाही. त्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात. यापुढेही शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी लढत राहू, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातील संघटनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
आंदोलनाच्या माध्यमातून संघटनांनी एकत्र येऊन शासनाकड़ून विविध प्रश्न सोडवून घेतले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर, सुकाणू समिती सदस्य शिवाजी खांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष मारुती शिंदे यांचे फार मोठे योगदान शिक्षण क्षेत्रातील संघटनांना लाभले आहे.
शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, सर्वच शिक्षक संघटना तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यावतीने एकत्रित या तिघांचाही सत्काराचा समारंभ निळू फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
जेव्हा ५० हजारांचे मोर्चे निघाले तेव्हा सरकारला दखल घ्यावी लागली. जूनी पेंशन विसरा म्हणणारे बैठकीला बोलवू लागले हा एकतेचा विजय आहे, असे शिवाजी खांडेकर यांनी सांगितले आहे. संघटनेला राजमान्यता नव्हती पण लोकमान्यता होती. ६२ वर्षाच्या इतिहासात १७ लाख कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले तेव्हा सरकारला राजमान्यता द्यावी लागली.
कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. योग्य त्याच मागण्या सरकारकडे मागितल्या म्हणून हे यश प्राप्त झाले, असे विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी कलाध्यापक मंडळ जिल्हाध्यक्ष आश्विनी कदम, दिगंबर देशमुख, दिपक चव्हाण, सुबोध किर्लोस्कर, सुरेंद्र सरतापे, गुलाबसिंग कदम गायकवाड, वृंदा हजारे, विक्रम काळे, राजीव रणवीर, प्रा. भगवान कोकणे, सुखदेव कंद, गाजरे, विजय जाधव, विनोद गोरे, महादेव माने, मनोहर जाधव, सचिन दुर्गाडे, हर्षा पिसाळ, मंगल शिंदे, जीवन इंगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुजित जगताप यांनी केले. सूत्रसंचालन वाझेदा मुलानी यांनी केले. आभार प्रसन्न कोतुळकर यांनी मानले.