जळोची -बारामतीमध्ये रेशनिंग धान्याचा अपहार, काळाबाजार किंवा साठा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रेशन दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी दिला आहे.
रेशनिंगचे धान्य हा गोरगरीब जनतेचा घास आहे. कोणत्याही दुकानदाराने रेशनिंगधारकांना धान्य कमी दिल्याचे आढळून आल्यास अथवा धान्याची चोरी केल्यास संबंधित रेशनिंग दुकानदारांचा परवाना रद्द केला जाईल. भिलारवाडी येथील रेशनिंग धान्य दुकानदार यांनी रेशनिंग धान्याचा साठा केल्याप्रकरणी तहसीलदार पाटील यांनी याची तत्काळ गंभीर दाखल घेतली आहे.
रेशनिंग दुकानांमधून धान्याची चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांच्या इतर तक्रारींची तत्काळ सुनावणी घेऊन संबंधित दोषी रेशनिंग दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा शाखेकडून देण्यात आली आहे. करोनाच्या संकटात गोरगरीब नागरिकांनी उपाशी राहू नये. यासाठी प्रशासनाकडून मोफत रेशनिंग धान्य दिले जात आहे.
अशा परिस्थिताही काही दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याचे भिलारवाडी येथील रेशनिंग दुकानदार प्रकरणामुळे निदर्शनास आले आहे. गोरगरीब रेशनिंग धान्यधारक शासनाकडून मिळणाऱ्या आपल्या हक्काच्या मोफत धान्यासाठी धावपळ करीत आहेत. दुसरीकडे रेशनिंग धान्य दुकानदार गोरगरिबांचे धान्याचा काळाबाजार करून त्यांच्या हक्काचे धान्य हिरावून घेत आहेत.