नव्या लॉकडाऊन काळात जेवण, निवासाची सोय करायची कशी?
पुणे -आगामी लॉकडाऊनमध्ये शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत. या बेघरांच्या राहण्यासह त्यांच्या जेवणाची सुविधा पुन्हा करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचीही चांगलीच कोंडी झाली असून, दहा दिवसांसाठी हे नियोजन कसे करायचे? याबाबत प्रशासनही हवालदिल झाले आहे.
देशव्यापी लॉकडाऊन काळात महापालिकेने बेघर तसेच शहरात अडकलेल्या परराज्यांतील मजुरांसाठी 29 ठिकाणी शेल्टर सुरू केले होते. त्यात, सुमारे 1,767 जणांची निवास तसेच जेवणाची व्यवस्था महापालिकेने तब्बल दीड महिना केली. त्यानंतर हे बेघर पुन्हा शहरात फिरत आहेत. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यानंतर या बेघरांचे काय करायचे? असा प्रश्न पालिकेसमोर आहे. आधीच महापालिकेकडे असलेले मनुष्यबळ कारोना नियंत्रणाच्या कामात आहे.
त्यामुळे या बेघरांची व्यवस्था करायची झाल्यास महापालिकेस शेल्टर सुरू करणे, येथे राहण्याची व्यवस्था करणे, दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा उभारणे ही सर्व कामे पुन्हा करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी असणारा कालावधीही प्रशासनाकडे खूप कमी आहे. त्यामुळे पालिकेचीही कोंडी झाली असून, या बेघरांबाबत निर्णय न घेतल्यास त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसणार आहे.