मुंबई – पदव्या घेऊनही नोकऱ्याच मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी आज घरात बसूनच डिग्री जाळा आंदोलन केले. त्यांनी संघटितपणे आपल्या पदव्यांची प्रमाण पत्र जाळून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले. या व्हिडीओंचा दाखला देत एका वाहिनीने हे वृत्त दिले आहे. पदवी जाळणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये डीएड, बीएड, टीईटी आणि अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश होता. सरकारी पातळीवरून अजून शिक्षक भरती प्रकिया बंद आहे. नवीन शिक्षक भरतीच होत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या पदव्या आता निरूपयोगी झाल्या आहेत असे निषेधाचे सूर काढीत आपल्या पदव्या जाळल्या. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वरील अभ्यासक्रम पूर्ण करून पदव्या मिळवल्या पण त्यांना त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या पदव्यांचा अन्य क्षेत्रात काही उपयोग नसल्याने त्यांना अन्यत्रही कोठे नोकरी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी निराश झाले आहेत. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी सरकारच्या कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.