भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय हा ज्यांच्याकडे सुनावणी होती त्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेला आहे. कोणताही सरकारी अधिकारी नियमाच्या विरुद्ध जाऊन काम करत नाही, हे उच्च पदावर काम केलेल्या लोकांच्या लक्षात येत नसेल तर ते दुर्दैव मानावे लागेल. बऱ्याचदा मोठी व्यक्ती म्हणून, आदर म्हणून कोणी बोलत नाही; परंतु सातत्याने चुकीच्या मानसिकतेने आरोप होत असतील तर या पुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी टीका कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावर केली.
पृथ्वीराज जाचक यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना ऊस न घालणाऱ्यांना मताचा अधिकार देण्याचे षड्यंत्र केले जात असल्याचा आरोप केला होता. त्या विषयावर प्रशांत काटे यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य करत जाचक यांच्यावर टीका केली आहे. काटे म्हणाले, छत्रपती कारखान्याची निवडणूक ही खेळीमेळीतच पार पडणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणी काळजी करण्याची गरज नाही.
छत्रपती कारखान्याचे बहुतांश सभासद हे कारखान्याच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार आहेत. या सभासदांना बरोबर घेऊनच कारखान्याचा कारभार होऊ शकतो हे आरोप करणाऱ्यांनाही माहित आहे; परंतु केवळ आणि केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे आरोप केले जात आहेत.
श्री छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून यासंदर्भातील सभासदांच्या अपात्रतेसंदर्भात कोणी आक्षेप घेतला? ज्यांनी आक्षेप घेतला तेच सुनावणीसाठीही उपस्थित राहिले, मग न्यायाची अपेक्षा करता, त्यावेळी जो निकाल आलेला आहे त्याचाही आदर करायला शिकले पाहिजे. आपली बाजू खरी असेल, तर निवडणुकीला थेट सामोरे जावे.
निवडणूक अधिकारी व प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे संचालक मंडळाने सभासदांच्या ज्या प्रावरूप याद्या पाठवल्या होत्या त्यावर प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला ग्राह्य धरून सभासदांच्या मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे.
– प्रशांत काटे, अध्यक्ष श्री छत्रपती साखर कारखाना, भवानीनगर