पवनानगर – लॉकडाऊनच्या काळात मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात भात पेरणीपूर्व मशागतीच्या कामे जोरात सुरू आहेत. मावळात भात हे मुख्य पीक आहे. पेरणीसाठी आता राब भाजायला सुरुवात झाली आहे. तसेच भाताबरोबर आता मावळात ऊस पीकदेखील घेण्यात येत आहे. उसाची पिकांतर्गत बांधणी, मशात सध्या सुरू आहे.
लॉकडाऊन असले तरी, शेतीच्या कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. भातलागवडीपूर्वी शेतीच्या मशात होणे महत्त्वाचे असते. भाताची पेरणी केल्यावर रोपात तण उगवून वाढू नये हा त्यातील मुख्य हेतू आहे. मृग नक्षत्रात करावयाच्या पेरणीसाठीची मशागत सुरू आहे. भात खाचरात बैलजोडीच्या मदतीने किंवा टॅक्टरच्या साहाय्याने रोपटे करून त्यावर राब भाजले जाते.
साधारणपणे एप्रिल-मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात भात पेरणीपूर्व मशागत केली जाते. इतकेच काय वावरात शेण खत आणि उकीरड्यावरील खत टाकण्याच्या कामे ही बळीराजा करीत आहे. काही शेतकरी उन्हाळ्यात पेरलेल्या बाजरीची राखण करीत आहे. तर काही जणांनी यंदाच्या हंगामात लग्नसराईत चांगले उत्पन्न मिळेल या हेतूने लावलेल्या काकडी, परसबी, खरबूजाच्या काढणीत मग्न आहे. मावळ तालुक्यात ऊस बांधणीला सुरुवात झाली आहे. शेतीची कामे लॉकडाऊन असले तरी मोठ्या जोमाने सुरू आहेत.