खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
जालना – शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात येणाऱ्या बि-बियाण्यांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे रास्तभावाने मिळतील, याची दक्षता घेण्यात यावी. खतांचा अथवा बि-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, राज्याचं संपूर्ण अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे खते, औजारे आदी साहित्य मुबलक प्रमाणात मिळावे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. गत तीन वर्षामध्ये दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात पीककर्जाचे वितरण करण्यात आले असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत यावर्षामध्ये ठरविण्यात आलेले 1120 कोटी रुपयांचे उद्दिष्ट वाढवून ते 1500 कोटी रुपये करण्याच्या सूचना करत दिलेले उद्दिष्ट हे शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे. ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात असमर्थ ठरतील अशा बँकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठ्यासाठी विद्युत विभागाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना करत टंचाईच्या काळामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा तसेच टंचाईबाबतच्या उपाययोजना राबविण्याचे अधिकार उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून पाणीपुरवठ्यासंदर्भात एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस विकला गेला पाहिजे. यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात यावीत. तसेच जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष यासह फळे विक्रीसाठीही मार्केट उपलब्ध होणे गरजेचे असून यासाठी मार्केट सुरु करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
लॉकडाऊनच्या काळामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून केशरी शिधापत्रिका धारकांनाही ८ रुपये व १२ रुपये किलो दराने गहू देण्याबाबत सूचना देण्यात आल्याआहेत. जिल्ह्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देत प्रत्येक गरजूला धान्याचे वितरण करण्यात यावे. धान्याचा काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांची गय न करता त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
देशासह राज्यावर कोसळलेल्या या राक्षसरुपी संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असून नागरिकांनी आपल्या घरातच राहून या आजारावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनीही खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या.बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.