श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील काष्टी शिवारातील पुनर्वसन परिसरातील रेल्वेलाईनच्या शेजारी खोदलेल्या शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता.श्रीगोंदा) हा शेततळ्यातील चिखलात रुतुन मयत झाला आहे.
१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले पण हे ठिकाण शेतकऱ्याने अनधिकृतपणे येथील मुरुम रेल्वेलाईनच्या कडेने टाकायला दिला होता. त्यामुळे येथे शेततळ्यासाठी खड्डा करून त्यामध्ये घोड कॅनॉलचे पाणी सोडून तो भरला होता.
खड्ड्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे मोठी दलदल झाली होती. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर आलाच नाही. सोबत नेलेला मित्र मूकबधीर असल्याने त्याने शेजारी अनेकांना हातवारे करून इशारे करत समीर बुडल्याचे सांगितले मात्र तो काय म्हणतोय हे कोणाच्या लक्षात येईना.
नंतर त्याच्या आईवडिलांना त्याने केलेले हातवारे खुणा समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला.मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री उशीरा शोकाकुल वातावरण अंत्यविधी करण्यात आला. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असलेला समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. तो गेल्याचे समजताच दोघांनी हंबरडा फोडला.