पावसाळा लांबलेला असताना आणि ताणलेल्या उन्हाळ्याच्या झळा राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी वाढलेल्या असताना तापमानवाढ वगैरे क्षुल्लक विषयांवर बोलणं खरं तर निरर्थकच! पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय आणि त्याचे तीव्र परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार, याची आठवण सहसा आपल्याला राहात नाही.
कारण, पुढच्या पिढ्यांसाठी प्रचंड पैसा कमावून ठेवण्याच्या उद्योगात आपण गुंतलो आहोत. या पिढ्यांना या पैशांचा उपयोग होण्याची शक्यता फार कमी आहे. तापमान वाढल्यावर आपली मुलंबाळं 24 तास एअर कंडिशन्ड जागेत बसतील, गाड्याही एसी वापरतील, ऑफिससुद्धा एसी असेल, त्यामुळे फिकीर करायचं कारण नाही, अशी आपली प्रामाणिक धारणा आहे; परंतु त्याही पलीकडे निसर्ग आपल्याला बरेच दणके देणार, हे आपल्या गावीही नाही.
तापमानवाढीच्या अनुषंगाने जे बदल घडतायत, त्याकडे आपले लक्ष ना आपले नेते जाऊ देतील, ना राजकीय पक्ष… दाराशी दिसत असलेल्या संकटावर मात करण्याचा, किमान तीव्रता कमी करण्याचा विषय त्यांच्या अजेंड्यात प्राधान्यक्रमावर असण्याची शक्यता धूसरच! इलेक्ट्रॉनिक मीडियाच्याही अजेंड्यावर आज भलतंच काहीतरी आहे. प्रमुख विषयांना स्थान द्यायचं नाही, असा चंग बांधूनच ब्ला ब्ला बकवास सुरू असते. परंतु वास्तव असं आहे की, आज आपले विचार जातीधर्माच्या पलीकडे गेले नाहीत, तर उद्या निसर्ग कोपेल तेव्हा ना जात पाहील ना धर्म.
आपल्या सर्वांना तो सारखंच झोडपून काढणार. या संदर्भानं इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संस्थेने दिलेली माहिती खरोखर गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ही संस्था काठमांडूत कार्यरत असून, पर्वतीय क्षेत्रातील बदलांचा अभ्यास करते. हिमालयाच्या शिखररांगांवरील बर्फ वितळण्याची प्रक्रिया सतत सुरू असतेच; पण या प्रक्रियेचा वेग गेल्या काही वर्षांत इतका वाढलाय, की त्यावरून काढलेले भविष्याचे अंदाज भयावह आहेत.
जो बर्फ वितळायला दोन हजार वर्षे लागली असती, तो अवघ्या तीस वर्षांत संपुष्टात आला असल्याचा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेने काढला. चालू शतक संपेपर्यंत हिमालयातल्या जवळजवळ 75 टक्के हिमनद्या पूर्णपणे वितळलेल्या असतील. असं झालं तर प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आठ देशांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागेल. गंगेसह 12 नद्यांना बर्फ वितळून प्रचंड पूर येतील आणि तो वाहून गेल्यानंतर प्रचंड पाणीटंचाई निर्माण होईल. या पट्ट्यात भारतासह पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान, चीन, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशचा समावेश आहे. मुख्य म्हणजे जागतिक तापमानवाढीला जे देश कारणीभूत नाहीत, त्यांच्यावरच सर्वाधिक दुष्परिणाम होणार. प्रगत देशांनी हे संकट टाळण्यासाठी नेमके काय केले, हे जाहीर करायला हवे.
हिमालयाच्या क्षेत्रात असलेल्या हिमनद्यांमधील बर्फ वितळण्याचा वेग 2010 पासून प्रचंड वाढून 65 टक्के झालाय. तापमान दीड ते दोन अंशांनी वाढलं तर बर्फ वितळण्याचा वेग 30 ते 50 टक्के अपेक्षित आहे. मात्र, तापमान तब्बल तीन अंशांनी वाढणार असल्यामुळे हिमनद्या 75 टक्के वेगानं वितळत जातील, असा भयावह निष्कर्ष संस्थेनं काढलाय. हे नुकसान कायमस्वरूपी असेल आणि ते टाळण्यासाठी सद्यःस्थितीत आपण काय करू शकतो, हा विषय सर्वसामान्यांनीच आता अजेंड्यावर आणला पाहिजे.
हिमांशू