‘सक्सेस स्टोरीज’ ऐकत वाढता-वाढताच खुरटणारी पिढी ‘आपण मोठे का झालो,’ असा विचार करत स्वतःलाच दोष देतीये. ‘मम्मी-पप्पा, मी जेईई उत्तीर्ण होऊ शकत नाही. मी लूजर आहे. मी खूपच वाईट मुलगी आहे. सॉरी, हाच शेवटचा पर्याय आहे,’ अशी सुसाइड नोट पुन्हा एकदा सापडली आणि वयात येत असलेली आणखी एक मुलगी छताला लटकलेली दिसली.
आसपास अशा अनेक घटना वारंवार बघायला मिळतात. त्या मानानं ही घटना बरीच दूरची, म्हणजे राजस्थानातल्या कोटा शहरातली. पण महत्त्वाची अशासाठी की, शिक्षणाचा ‘कोटा पॅटर्न’ बराच चर्चेत आहे. असे अनेक पॅटर्न आपण पाहिलेत; पण बहुतांश सगळे पॅटर्न मुलांना स्पर्धेकडे ढकलणारेच आहेत. ऊर ङ्गुटेपर्यंत धावा आणि सगळ्यात पुढे जा. कसं ते आम्ही सांगू, असा दावा करणारे हे पॅटर्न आहेत. शर्यतीत कुणीतरी पुढे जाणार, याचाच अर्थ कुणीतरी मागे राहणार. मग मागे राहिलेल्यांनी निराश व्हायचं, स्वतःला दोष द्यायचा, आपल्यात काहीच गुण नाहीत असं गृहित धरायचं, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना टाळ्या वाजवायच्या आणि घरच्यांनी दिलेली दूषणं ऐकायची, हे सगळं ओघाने आलंच. शक्य तेवढा ताण सोसायचा, अगदीच असह्य झालं तर पंख्याला लटकायचं, हाही ‘पॅटर्न’च!
आनंददायी शिक्षणाला आपल्याकडे पहिल्यापासून विरोध. शिकायचं कशासाठी? तर स्पर्धेत पुढं राहण्यासाठी. डिग्री, नोकरी, भाकरी, छोकरी हा क्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून! कोटा शहरातच आठवड्यात दोन आत्महत्या झाल्यात. या शहरात रस्तोरस्ती बघावं तिकडे सॅक पाठीवर अडकवलेले विद्यार्थी दिसतात. यूपी, बिहारमधून लाखो विद्यार्थी येतात. होस्टेल्स, मेस आणि पेइंग गेस्ट्स या माध्यमातून अनेकांना व्यवसाय मिळाला असून, एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच उभी राहिलीये.
कोचिंग क्लासेस, शाळा आणि होस्टेल… सर्वत्र अभ्यास एके अभ्यास! क्लासला दांड्या मारणारे आणि त्यांच्या नावावर ‘कार्ड पंच’ करणारेही इथं आहेत, असं अधूनमधून प्रसिद्ध होत असतं. परीक्षेत अपयश आल्यानंतर तिथेच होस्टेल सुरू करणारे महाभागही सापडतात म्हणे! वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे ग्रुप्स बनवणं आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्याही आहेत; पण अर्थकारणाखाली अशा गोष्टीही बर्याचदा झाकल्या जातात.
गेल्यावर्षी अनेक आत्महत्या झाल्यावर दिल्लीचे पत्रकार कोटा शहरात पोहोचले, तेव्हा थोडीङ्गार माहिती प्रसिद्ध झाली होती. अभ्यासाचा ताण, कुटुंबीयांचा दबाव आणि विद्यार्थ्यांमधील स्पर्धा ही आत्महत्यांची ठळक कारणं सांगितली जातात. शिकण्यात आनंद मिळणं, योग्यता आणि आवडीनुसार शिक्षण मिळणं, या बाबी तशा दुर्मिळच! भविष्यात कधीच आणि कुठेच उपयोगी पडणार नाही अशी घोकंपट्टी करण्याकडे आपला कल अधिक. करिअरसाठी अनेक क्षेत्रं आहेत आणि आवडीप्रमाणं ती निवडता येतात, हे ना पालक मुलांना सांगतात, ना शिक्षक! सगळ्यांना एकाच शर्यतीत ढकलून देणं, जिंकणार्यांच्या ‘सक्सेस स्टोरीज’ जाहिरातींचा विषय बनणं आणि हरणार्यांना ‘गुड ङ्गॉर नथिंग’ मानणं, यातून आकाराला आलेला आणि वाढत चाललेला आत्महत्यांचा पॅटर्न दुर्लक्षित होऊ नये, इतकंच!