जीवनाची सुरुवात एकपेशीय प्राण्यापासून झाली, असं विज्ञान सांगतं. हे विज्ञानसुद्धा आपण ‘माणूस’ बनल्यानंतर आपल्याला समजलं. आपण माणूस बनण्याची प्रक्रिया हजारो-लाखो वर्षे सुरू होती. आपला मेंदू पृथ्वीतलावरील इतर पशुपक्ष्यांपेक्षा अधिक सरस ठरला आणि आपण निसर्गालाही आव्हान दिलं.
अन्न शिजवून वगैरे खाऊ लागलो. थंडीवार्यापासून रक्षण करण्यासाठी कपडे बनवले. चाकाचा शोध लावून जीवनाला गती दिली. अवजड यंत्रसामग्री तयार करून शारीरिक श्रम कमी केले. माणसा-माणसात विसंवाद असले तरी ‘कम्युनिकेशन’ मात्र सुधारत गेलं, अशीच नोंद इतिहासानं घेतली. यथावकाश आपण आपल्यासारखाच यंत्रमानव तयार केला. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली. मानवी मेंदूलाही आव्हान देईल, इतपत ती विकसित वगैरे केली. आता पुढे काय..?
रोजच्या कामांच्या धबडग्यात आणि ङ्गालतू विषय मुख्य चर्चाविषय बनवण्याच्या चढाओढीत हा खरोखर महत्त्वाचा प्रश्न आपल्याला कधीतरी पडायला हवा, नाही का? मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा ‘सायबोर्ग’ हा असेल, अशी कल्पना काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. चार पायांवर चालणार्या वानरापासून दोन पायांवर ताठ उभं राहून चालणार्या माणसापर्यंत झालेल्या विकासानंतर आता ‘अर्धे शरीर आणि अर्धे यंत्र’ हाच पुढचा टप्पा असणार, असं विज्ञानाच्या क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितलं. अनेकांना ही कविकल्पना वाटली आणि अजूनही वाटते. मानवी मेंदूत चिप बसवून क्रांतिकारक बदल घडवून आणायचे, अशी प्रारंभिक संकल्पना मांडली गेली.
या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेनं माणसाचं पहिलं पाऊल पडलंय. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केल्यानंतर माणसाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेलाच ती जोडण्याची दुसरी पायरी आपण पार केलीये. अॅलन मस्क यांच्या न्यूरोलिंक या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीनं थेट मानवी मेंदूत मायक्रोचिप बसवली असून, संबंधित व्यक्तीची प्रकृती आता पूर्ववत होतेय, अशी माहिती खुद्द मस्क यांनी दिलीय. प्रारंभिक परिणाम आशादायक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या उत्पादनाला ‘टेलिपथी’ असं नाव दिलं गेलंय. मेंदूत चिप बसवण्यासाठी परवानगी मिळवल्यानंतर स्वयंस्ङ्गूर्तीनं स्वतःवर प्रयोग करून घेऊ इच्छिणार्यांची कंपनीने रीतसर ‘भरती’ केली होती म्हणे! एखादी नैसर्गिक शक्ती नसणार्या, म्हणजेच चालता न येणार्या, बोलता न येणार्या व्यक्तीला ही चिप ङ्गायदेशीर ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.
मस्क यांच्या म्हणण्यानुसार आता मानवी मेंदू कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी जोडता येईल. परंतु अशा प्रकारे थेट मेंदूत अशा तंत्रज्ञानाची घुसखोरी करणं योग्य आहे का, या विषयावरही चर्चा सुरू झालीय. अर्थात, नैतिक वगैरे शब्दांच्या खूप पुढे आपण आधीच गेलो आहोत. पण तंत्रज्ञानाने अपेक्षेच्या बरोबर उलट दिशेनं काम केलं तर काय करायचं?
प्रश्न अनेक आहेत आणि उत्तर एकच आहे. नव्याची आस. नव्या शक्तीचा शोध. आपण अणूपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत अनेक नव्या शक्ती आधुनिक काळात शोधून काढल्या; पण त्यांचा उपयोग किती झाला आणि दुरुपयोग किती झाला हे उघड गुपित आहे. बाकी, या चिपमुळे मेंदूवर ताबा वगैरे घेतला जाईल, ही अंधश्रद्धा आहे. कारण त्यासाठी आत चिप बसवलीच पाहिजे, असं नाही. असो, जग खूपच पुढं चाललंय आणि आपण अजून अंधश्रद्धाच चघळतोय.