घटना अमेरिकेतल्या ह्यूस्टन शहरातली आहे. 67 वर्षांचा एक म्हातारा पत्नी आणि मुलीसोबत खरेदीसाठी बाहेर पडला. खरेदी उरकल्यावर तो कारजवळ गेला आणि दरवाजा उघडू लागला. तेवढ्यात दोन तरुण तिथे आले आणि त्या म्हातार्याला बेदम मारहाण करू लागले. म्हातार्याला काहीच समजेना.
अचानक झालेला हा हल्ला नेमका कशासाठी? आपल्याला लुटायला आलेले हे चोरटे आहेत का? असतील तर केवळ धाक दाखवून लुटण्याऐवजी यांनी थेट मारामारी का सुरू केली? आपलं काही चुकलं तर नाही? पण आपण तर यांना काही बोललोही नाही. आपली यांच्याशी ओळखसुद्धा नाही, मग शत्रुत्व असण्याचा प्रश्नच नाही. कुणी आपल्यावर मारेकरी घालावेत, असं शत्रुत्व आपलं कुणाशीच नाही. मग हे दोघे आपल्याला का मारताहेत? हे सगळे विचार करेपर्यंत म्हातार्यानं बराच मार खाल्ला होता.
चेहर्यावर बुटाच्या लाथा बसून डोळ्याजवळ जखम झाली होती. पोटात लाथा बसल्यामुळे कमालीच्या वेदना होत होत्या. मग ज्या कारचा दरवाजा म्हातारा उघडू पाहात होता, त्याच कारमध्ये बसून मारहाण करणारे निघून गेले. त्यांनी कार चोरली नाही. ती त्यांचीच होती. म्हातार्याला चुकून ती कार आपलीच वाटली होती आणि जे काही घडलं, त्याचं कारण हेच होतं. तो म्हातारा आपली कार चोरतोय, असा संशय या तरुणांना आल्यामुळे त्यांनी थेट ‘अॅक्शन’ सुरू केली होती.
वास्तविक, या घटनेचं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, त्यात म्हातारा कारच्या पुढच्या दरवाजाला हात लावून मग मागचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करताना दिसतोय. बॅकसीटवर बसून कुणी कार चालवू शकत नाही. पण विचार करायला वेळ कुणाला असतो हल्ली? वास्तविक आपलं बोलणं आणि कृती हा विचारांचा अंतिम आविष्कार असतो; पण हल्ली विचारांची ही प्रक्रिया संपुष्टात आलीये का, असाच प्रश्न पडतो. त्या म्हातार्याला डिमेंशिया आणि अल्झायमरचा त्रास होता.
स्मृतिभ्रंशामुळे तो त्याची कार ओळखू शकला नव्हता. असे छोटे-मोठे प्रसंग आपल्याही पाहण्यात अनेकदा येतात. दिसतं तसं नसतं म्हणून फसगत होण्याची वेळ आपल्यावरही कधीतरी आलेली असते; पण विचार न करता टोकाची कृती करण्याचा आजार डिमेंशियापेक्षा मोठा नाही का? डिमेंशियासारख्या आजारांबद्दल मुळातच जागरूकता आणि संवेदनशीलता अत्यल्प आहे.
आपल्या देशातसुद्धा साठी ओलांडलेल्या 17 टक्के म्हणजेच 88 लाखांहून अधिक वृद्धांना हा त्रास आहे. जन्मभर शिणलेले हे मेंदू तरुण मेंदूंकडून फक्त विचारांची अपेक्षा करतायेत. पण जगात कायदा नावाची वस्तू अस्तित्वात आहे, याचाच विसर पडण्याचा आजार जडलेल्यांचं काय करायचं?
डिमेंशिया आणि अल्झायमरपेक्षाही भयानक असा हा आजार आपल्याकडे झुंडबळींच्या घटनांमधून अनेकदा दिसून आलाय. ‘मुलं पळवणार्या टोळी’च्या अफवा आणि त्यानंतर झालेला रक्तपात विसरता येईल का? संशयास्पद व्यक्ती दिसली तरी चौकशीसाठी पोलीस आहेत, याचा विसर पडतो की आपल्याला मेंदू आहे, याचाच विसर पडतो? हाच मेंदू लोकांना आपापल्या नेत्यांची कालची वक्तव्यं आणि भूमिका आज विसरायला भाग पाडतो. मग उतारवयात मेंदू थकल्यामुळे होणारा स्मृतिभ्रंश आणि ऐन तारुण्यातला सोयिस्कर स्मृतिभ्रंश यातला अधिक घातक कोणता?