हमांशू
क्रिकेट हा अत्यंत अनिश्चित, बेभरवशाचा खेळ आहे हे ठाऊक होतं. पण खेळाडू इतके बेभरवशाचे असतात हे खरोखर ठाऊक नव्हतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ज्या संघाचं नाव अव्वलस्थानी आहे, त्या संघातले फलंदाज एखाद्या दिवशी अशी नांगी टाकतील आणि विकेटला शिवून एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परततील, असं कुणालाही वाटलं नसेल.
ऑस्ट्रेलियात कसोटी इतिहासातील सर्वांत नीचांकी धावसंख्या नोंदवणाऱ्या भारतीय संघाबद्दल संतापाची भावना शनिवारी सर्वत्र पाहायला मिळाली; परंतु त्याहीपेक्षा आश्चर्याचीच भावना अधिक होती. अडचणीच्या काळात जे “किमान कौशल्य’ आणि “किमान जिद्द’ दिसायला हवी तीही दिसत नसेल तर 120 कोटींमधून 11 जण निवडताना नेमके कोणते निकष लावले होते, असाच प्रश्न पडेल. 4 बाद 15 किंवा 6 बाद 19 अशी धावसंख्या ऐकताना ही गल्लीतली क्रिकेट मॅच असावी, असंच कुणालाही वाटेल.
1974 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वांत कमी म्हणजे सर्वबाद 58 इतका स्कोअर केला होता. ते वर्षच भारतासाठी अत्यंत मानहानीचं ठरलं होतं. कारण त्याच वर्षी भारताने सर्वांत नीचांकी धावसंख्या इंग्लंडविरुद्ध नोंदविली होती. ती होती सर्वबाद 42. परंतु हा विक्रमसुद्धा शनिवारी मोडीत निघाला आणि अवघ्या 36 धावांमध्ये भारताने 9 गडी गमावले. मोहंमद शमी “रिटायर्ड हर्ट’ झाला आणि खेळ संपुष्टात आला.
खेळात हार-जीत असते आणि ती खिलाडूपणे स्वीकारायला हवी हे खरं; परंतु जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या संघाची अशी घसरगुंडी मन स्वीकारूच शकत नाही त्याचं काय? फलंदाजीत आणि गोलंदाजीतसुद्धा जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी असलेले खेळाडू आपलेच आहेत. त्यामुळे 9 बाद 36 ही मानहानिकारक धावसंख्या ऐकल्यावर “पॅव्हेलियनमध्ये काही घडलं होतं का,’ हाच किडा डोक्यात सर्वप्रथम वळवळला.
शुक्रवारी भारतीय गोलंदाजांनी बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांवर रोखलं तेव्हा जिवात जीव आला होता. घसरण कांगारूंचीही होऊ शकते, तीही त्यांच्याच मैदानावर… हे पाहून आपल्या खेळाडूंबद्दल अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु दुसऱ्याच दिवशी इतकी तीव्र घसरण पाहायला मिळावी, हे खरं म्हणजे क्रिकेटरसिकांचंच दुर्दैव! आठ विकेट राखून ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला.
भारताला पराभव पत्करावा लागल्याचं दुःख भारतीयांना फारसं झालं नाही; पण सगळं काही इतकं एकतर्फी व्हावं, हे निश्चितच धक्कादायक होतं. पूर्वीच्या काळी भारत क्रिकेटमध्ये जिंकू शकतो, असं मुळात कुणाला वाटतच नसे. अगदी प्रशिक्षकसुद्धा सामना अनिर्णित ठेवण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना खेळाडूंना करीत असत, असं सांगितलं जातं. परंतु अशा काळापासून आजअखेर क्रिकेटशौकिनांचं या खेळावरचं प्रेम टिकून आहे.
कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात मिळालेलं यश म्हणजेच विजय, अशी मानसिकता असण्याचा काळ आता राहिलेला नाही. आक्रमकता आणि कौशल्यात भारतीय क्रिकेटपटू इतर देशांच्या खेळाडूंपेक्षा काकणभर सरसच असण्याचा काळ आपण पाहतो आहोत. अशा वेळी ही घसरण जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे. नेटकऱ्यांनी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना लक्ष्य केलंय. या घसरगुंडीचं प्रामाणिक विश्लेषण केलं जाईलच; परंतु संघात काही अंतर्गत कुरबुरी आणि गट-तट तर नाहीत ना, हेही आताच कठोरपणे तपासलेलं बरं!