– अरुण गोखले
मानवी मन हे ङ्गार विलक्षण आहे. त्याचा थांगपत्ता हा मी मी म्हणणार्यांनाही लागत नाही. ते चंचल आहे तसेच ते जिथे रमते तिथेे ते गुंतून पडते. जिथे आवड निर्माण होईल, तिथे गुंतणे हा त्याचा स्थायी स्वभाव आहे. संत कबीरांनी हाच मानवी मनाच्या गुंतण्याचा स्वभावाचा बारकाईने विचार केला. मगच त्यांनी बहुमोल सल्ला दिला की बाबांनो! गुंतणे हा मानवी मनाचा स्वभाव आहे. तो त्याचा गुणधर्मच आहे. म्हणून मनाला नेमकं कुठे आणि कशात गुंतवायचे ह्याचा तुम्ही नीट विचार करा.
संत कबीरांचा ‘यहाँसे उखाडना, और यहाँ लगाना’ हा जो उपदेश आहे तो ह्यासाठीच. स्वानुभवाच्या बळावर ते म्हणतात की मी तो विचार केला. तशी कृती केली आणि मी खरा सुखी समाधानी आणि स्वानंदी झालो. मानवी मन हे धनाशी गुंतते, प्रेमात अडकते. एकदा का एखाद्याला प्रेमाने आपले म्हटले की त्याच्यावर प्रसंगी त्याच्यावर जीवही ओवाळून टाकते. हे सारे मनानीच केले जाते. कारण तो त्याचा स्वभाव आहे. मी त्याला प्रपंच्याच्या क्षणिक सुखात न गुंतवता परमार्थाच्या भजनाच्या अक्षय सुखात गुंतवले.
मी स्वार्थी, लोभी, नाटकी लोकांशी जवळीक न साधता विवेक विचाराने माझ्या मनास जन्मोजन्मी साथ देणार्या माझ्या खर्या सख्या आणि सोयर्या ईश्वराशी जोडले. त्याला व्यावहारिक लाभ हानीचे छंद न लावता त्यास चिरंतन सुख देणार्या भक्तीची गोडी लावली. मी माझ्या मनास संतबोधाचे तेल लावून या भवसागरात उतरलोे आहे. मला इथले वृत्तीचे मासे चावत नाहीत.
मी पाण्यात असूनही पाण्याचा स्पर्श नसणार्या कमलपत्रासारखा वेगळा आहे. कारण मी देहानी जरी त्यात असलो तरी माझं मन हे त्यात गुंतलेले नाही. मी माझ्या मनास त्याच्या खर्या हितकारी मार्गाशी जोडले आहे. त्याला ईश्वरनामाच्या स्वानंद सुखात गुंतवले आहे. आता ते तिथे इतके गुंतले आहे की तिथून त्यास बाहेरच पडावेसे वाटत नाही. म्हणूनच आधी केले मग सांगितले हा असा माझा बोध ध्यानी धरा. मनाचा गुंता लक्षात घ्या आणि त्याला योग्य आणि कल्याणकारी जागीच गुंतवा.