टळटळीत दुपारी एक वेडसर वाटणारा माणूस चौकात डिव्हाइडर म्हणून लावलेल्या लोखंडी रेलिंगवर भलामोठ्ठा दगड अगदी जवळून फेकतो आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक अचानक ठप्प होते. खाली पडलेला तो दगड उचलून तो माणूस पुनःपुन्हा रेलिंगवर फेकत राहतो. वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनधारक आणि पादचारी घाबरून जागच्या जागी थांबलेले असतात; पण त्या माणसाला अडवायला जाण्याची हिंमत कुणालाच होत नाही. आपण उगीचच शूरपणा दाखवायला गेलो आणि त्या माणसानं तोच दगड आपल्या डोक्यात घातला तर? माणूस दगड उचलण्यासाठी खाली वाकल्यावर मिळणाऱ्या काही सेकंदांच्या अवधीत काही बाइकस्वार आणि पादचारी पटकन चौकातून कसेबसे सटकून पुढे निघून जातात.
चारचाकी चालकांना मात्र ते धारिष्ट्य दाखवता येत नाही. मळकट फाटक्या कपड्यातला, वाढलेले केस विस्कटलेला हा दाढीवाला माणूस दारुडा असावा, हे लोकांच्या लक्षात येतं. आजूबाजूला पोलीस दिसतोय का याची चाचपणी करून काहीजण पोलीस दलाला दूषणं देऊ लागतात. रेलिंगच्या दोन्ही बाजूंनी आलटून-पालटून दगड मारून झाल्यावर रेलिंग खालून कमकुवत होतं. तो माणूस आता ताकद एकवटून दोन्ही हातांनी रेलिंग हलवू लागतो. रेलिंगचा एक तुकडा अखेर त्या माणसाच्या हाती लागतो आणि तो खांद्यावर टाकून एखाद्या शिकाऱ्याच्या ऐटीत तो माणूस निघून जातो. हा तुकडा तो भंगारात विकणार आणि बाटलीची सोय करणार, हे सर्वांना कळून चुकतं.
सार्वजनिक उपयोगाच्या लोखंडी वस्तूंच्या नशिबी हेच लिहिलेलं असतं. म्हणूनच महानगरांमधल्या गटारांवरची झाकणं सतत चोरीला जातात. उघड्या गटारामुळे एखादा अपघात घडला, की पालिका सक्रिय होते आणि नवं झाकण बसवते. अनेकदा पालिकेला जाग आणण्यासाठी कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. पण आभाळच फाटलं तर पालिका तरी किती ठिगळं लावणार? गटारावरचं जाडजूड गोलाकार झाकण चांगलंच “वजनदार’ असतं. साहजिकच किंमतही पुष्कळ असते. मुंबईत यावर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत गटारांवरची 400 झाकणं चोरीला गेल्याचं उघड झालंय.
गेल्या वर्षभरात 836 झाकणं चोरट्यांनी लांबवली होती. पालिकेच्या म्हणण्यानुसार, चार वर्षांमधली ही सर्वाधिक संख्या होती. याही वर्षी मोठ्या संख्येनं झाकणं चोरीला गेल्यामुळे अखेर पालिकेनं पोलिसांत तक्रार नोंदवलीय. सुमारे 50 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवणाऱ्या पालिकेनं चोरट्यांचा अंदाजे आकडा कसा काढला, हे समजायला मार्ग नाही. गटारांवरच्या झाकणांची एकंदर संख्या पाहता, प्रत्येक झाकणाला कुलूप लावणं शक्य नाही. स्वच्छता वा दुरुस्ती करायची झाल्यास नेमकी किल्लीही वेळेवर सापडणार नाही. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेनं भंगाराचा व्यवसाय करणाऱ्यांनाच सज्जड दम भरला, हे चांगलं केलं.
संततधार पावसामुळे जेव्हा मुंबई तुंबते, तेव्हा या झाकणांचं महत्त्व मुंबईकरांच्या लक्षात येतं. उघड्या गटारांमधून वाहून गेलेली माणसं समुद्रात शोधावी लागतात. याच गटारांमध्ये उतरून स्वच्छता करणारे अनेक कामगार “गॅस लागल्यामुळे’ तडफडून मृत्युमुखी पडतात. झाकणं नसती तर हा गॅस रस्त्यांवर पसरला असता. एरवी दुर्लक्षित राहणारी ही लाखमोलाची झाकणं चोरणाऱ्या चिंधीचोरांना आणि ती विकत घेणाऱ्या भंगारवाल्यांना चाप लावलाच पाहिजे. गटाराप्रमाणे वाहणारी तोंडं आणि विकृत समाजमाध्यमी कृमींवर झाकणं लागतील तेव्हा लागतील!
हिमांशू